Tuesday, 27 April 2021

Everything has to be done by me : सगळं ‘मी’ च करायला हवे

 

सगळं ‘मी’ च करायला हवे

                    एक दिवस उजाडतो. आपल्या समोर कामाचा डोंगर अचानक उभा राहतो. हे काम करू, का ते काम करू का ते करू, सगळा गोंधळ उडतो. क्रम ठरवायला गेलो  तर सर्वच कामे महत्वाची वाटू लागतात. मग कोणते काम प्राधान्याने करायचे व कोणते नंतर करायचे हेच लवकर ठरत नाही.

                   मनाचा गोंधळ उडतो. धावपळ व्हायला लागते. हे करू कि ते करू यात कोणतेच काम धड्से होत नाही.  प्रथम कोणते काम करायचे हे ठरवायला व आपले काम तर ठरतच नाही व  आपले काम न ठरता आपला बराच वेळ फक्त ठरवण्यात जातोय हेच समजायला बराच वेळ जातो.

                  तसे बघायला गेले तर हा सर्व पसारा व कामाचा डोंगर आपणच उभा केलेला असतो. फक्त त्या-त्या वेळी आपल्या कामाचा योग्य पाठपुरावा करून काम पूर्ण न केल्यामुळे ती कामे आपल्या पुढे ब्रह्म म्हणून अचानक उभी राहतात आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो.

                  मुळातच प्रत्येक गोष्ट आपल्या साठीच आहे , प्रत्येक वेळी ती आपणच करायला हवी व आपल्यालाच मिळायला पाहिजे. कदाचित या सर्वाचा एकत्रित परिणामातून अनेक प्रश्न निर्माण होत असतील. बहुतेक वेळा आपल्या अतिमहत्वकांक्षेचा हा त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो व आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.

                 आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी. निसर्गाचा एक अंतिम नियम आहे. आपण नव्हतो त्यावेळीही जगाच्या सर्व क्रिया सुरळीत सुरु होत्या, सध्या  आपण काहीही केले नाही तरीहि हे सर्व सुरळीत असणार आहे व उद्या आपण नसल्यावरही हे सुरूच राहणार आहे.

           फक्त आपला एक मोठा गैरसमज आहे कि “सगळं मी च करायला हवे.”

कदाचित हाच आपल्या समोरील प्रश्न व हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकेल!!!

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

Friday, 9 April 2021

Guddhi Padwa : गुढी पाडवा

 

गुढी पाडवा

‘जुन्या दुखःना मागे सोडून

स्वागत करा नववर्षाचे

गुढी पाडवा घेऊन येतो क्षण  

प्रगती व आनंदाचे’

 

                 आपल्या भारत देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. म्हणूनच आपल्या देशाला सणांचा देश म्हणूनही ओळखले जाते. भारतीय पंचागानुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. गुढी पाडवा हा चैत्र महिन्यातील पहिल्या दिवशी महाराष्ट्रा बरोबर भारतातील अनेक प्रांतामध्ये साजरा केला जातो.

              परंपरेनुसार मानले जाते की, गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रम्ह देवाने विश्वाची निर्मिती केली होती. तसेच दुसऱ्या कथेनुसार गुढी पाडव्याच्या दिवशी भगवान श्रीराम आपला १४ वर्षाचा वनवास भोगून आणि रावणाचा वध करून अयोध्या नगरीत परत आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील जनतेने गुढ्या आणि तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले होते.

                 महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवले जाते, गुढीच्या काठीला कडुलिंबाची डहाळी किंवा आंब्याची पाने बांधतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. पाटाभोवती सभोवती रांगोळी घातली जाते. तयार केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर लावतात.

                गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करतात. घरात गोड गोड पदार्थ करतात.  आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा तसेच  गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात.

               चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते

                   गुढी पाडव्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. विद्यार्थी आपल्या पुस्तकाचे पूजन करतात. पालक आपल्या मुलांना गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शाळेत दाखल करतात. गुढी पाडवा हा दिवस हिंदू पंचागानुसार असणाऱ्या साडे तीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन जागा, वास्तू , वस्तू, वाहन, दागिने खरेदी केले जातात. असे मानले जाते कि, या दिवशी हातात घेतलेले काम यशस्वी होते.

                      गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे त्याच पद्धतीने त्याचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक महत्त्व देखील आहे. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो. या वेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. गुढी पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते. गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुद्धा म्हटले जाते

                  गुढी पाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. हा सण प्रसन्नतेचा साज घेऊन येतो. गुढी पाडवा हा सण विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढी पाडवा हा सण गोड धोडाचा, पंचाग पूजेचा,  चैत्र पालवीने नटलेला आणि वसंत ऋतूच्या आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपणा सगळ्यांनी मिळून साजरा केला पाहिजे.

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

 

 

 

 

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...