Friday, 17 October 2025

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. आपल्या घरात लगबग सुरू झाली असेल. झाडलोट, पसारा आवरणे या गोष्टी ' शास्त्र असते ते' असे मानून आपली इच्छा असो अथवा नसो तरी निष्ठेने सुरू असते. जुने काढून नव्याला नवीन जागा केली जात आहे. आवश्यक गोष्टीची दुरुस्ती करून अनावश्यक गोष्टीला हळुवारपणे घराच्या बाहेरचा रस्ता दाखवल्या जात आहे. नवीन गोष्टीसाठी आवश्यक जागा मोकळी केली जात आहे. 
               हे सर्व झाल्यावर किती छान वाटत हो ना? अगदी मोकळं मोकळं आणि नव्याच्या उत्सुकतेची वाट पाहणारी रिकामी जागा.
          ही सर्व साफसफाई झाल्यावर घर किती छान व नीटनेटक वाटतो हो ना? अनावश्यक गोष्टी बाहेर गेल्याने नव्या गोष्टींसाठी खूप जागा रिकामी झाल्याने घराचे रूप अजून खुलून येत. पण हे झालं घराचं पण आपल्या मनाचं काय?
            या सणाच्या निमित्ताने आपले मन ही आवरायला घेऊया...
            वाचून थोडे गोंधळात पडलात? घराच्या साफ-सफाईला आपण जेवढे महत्त्व देतो तितका वेळ आपण आपल्या मनासाठी काढत नाही. 
            या सणाच्यानिमित्ताने आपण ही आपल्या मनाचे कोपरे आवरायला घेऊया. माणसांच्या मेळात आणि विचाराच्या घोळात दररोज वावरत असताना आपल्या मनाचे अनेक कोपरे अनेक गोष्टींनी भरून गेलेले असतात. त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आणि आयुष्यभरासाठी जपण्यासारख्या असतात.  त्याचे महत्त्व अमूल्य असते. त्यांना पुन्हा उजाळा देऊन मनाच्या खास कोपऱ्यात पुन्हा दिमाखाने ठेवायच्या असतात.
            पण या मनाच्या घरात अशा अनेक अनावश्यक व आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी खोल कुठेतरी रुतून बसलेले असतात. त्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर ते आपल्या दुःखाचे कारण बनतात. "साचून राहिले की कुजते" या निसर्गाच्या नियमाने अनावश्यक गोष्टी खूप दिवस मनात साठवून राहिल्या की त्या त्रासाशिवाय आपल्याला काही देऊ शकत नाही. याप्रसंगी आपण आपल्या मनातील अशा गोष्टी बाहेर काढूया. वाईट विचार बाजूला ठेवूया. ज्या व्यक्तींनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांना माफ करून त्यांचा विचार सोडून देऊया. ज्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा त्यांचा त्रास होतो त्या गोष्टी let go करूया. अनावश्यक गोष्टींची जागा रिकामी करूया. ज्यांच्याशी भांडण झाले, ज्यांच्याशी वाद झाले, मतभेद झाले अशा गोष्टी खूप वेळ मनात ठेवण्यापेक्षा तर सोडून दिलेल्या कधी चांगल्या. त्रास देणारी प्रत्येक गोष्ट व्यक्ती, परिस्थिती व ठिकाण आपण सोडून द्यायला शिकले पाहिजे. 
                 चांगल्या आठवणी, चांगले लोक, चांगले संवाद यांना पुन्हा उजाळा देऊन ती जपून ठेवूया. चांगली नाती, चांगले विचार, चांगले लोक यांना अडगळीत जाऊ न देता त्यांना महत्त्व देऊया. त्यांच्याशी संवाद साधूया. चांगल्या व आपल्या व्यक्तींशी वेळ काढून संवाद वाढवूया. 
                 टाचणी कितीही हलकी व छोटी असली तरी आपण ती फार वेळ हातात धरू शकत नाही. त्याप्रमाणे त्रास देणारी गोष्ट किती लहान असली तरी ती फार काळ मनात राहिली तर त्याची आडगळ होते. या मनाच्या आवारावरीत या गोष्टी बाहेर काढून नवीन क्षण, नाती, विचार व व्यक्ती यासाठी जागा करूया.
               या सणाच्या निमित्ताने घराबरोबर मन ही आवरायला घेऊन दुःखाची, त्रासाची, वेदनेची, अपराधीपणाची जळमटे अडगळीच्या कोपऱ्यातून बाहेर काढून चांगल्या क्षणांची, विचारांची, व्यक्तींची जागा सक्षम करून नवीन गोष्टीसाठी मनाची कवाडे पुन्हा एकदा उघडू या.
धन्यवाद!!!!!


© संदिप कोळी 
9730410154
sandip.koli35@gmail.com

Monday, 26 May 2025

संवेदनशील मन

संवेदनशील मन
            आपल्या जेवणात नाना प्रकारचे अन्नपदार्थ येतात. वरण, भात, पोळी, कोशिंबीर, भाजी यांनी सजलेले ताट हे आपल्याला सौभाग्य सूचक वाटते. या ताटातील सर्व पदार्थ पोटात एक होतात, पण ताटात त्यांची स्वतंत्रता सांभाळली जाते. त्यावर घडणारी पाकक्रिया वेगवेगळी असते. शिजण्यापासून पचण्यापर्यंत प्रत्येक पदार्थाला लागणारा कालावधी एकसारखा नसतो.
              माणसाच्या मनाचे ही असेच आहे. विचार, विकार, संकल्प, बुद्धी, भावना, प्रेरणा अशा विविध रूपाने ती प्रकट होते. मनाचे बदलते रूपे संदर्भ सापेक्ष असतात. कोणत्या वेळी कोणी पुढे यावे याचा विवेक मनाच्या ठायी असतो. मेंदूच्या रूपाने मानवाला प्रचंड बुद्धिमत्ता मिळाली, त्याचप्रमाणे मनाच्या रूपाने मानवाला प्रचंड कल्पनाविश्वही मिळाले आहे. अस्तित्वात असणाऱ्या किंवा आपण मानणाऱ्या गोष्टीतील सर्वात चंचल व सर्वात स्थिर म्हणजे आपले मन. सतत कल्पनाविश्वात व स्वप्न रंजनात रमणारे मन ही माणसाची खूप मोठी सुप्त शक्ती आहे.
                विज्ञानाच्या संकल्पनेत आपण 'मन' सिद्ध करू शकत नाही, किंबहुना आपल्या शरीरात मन नावाचा अवयव नाही, पण तरीही मानसशास्त्रात मनाचे सामर्थ्य ठळकपणे अधोरेखित केले आहे. मानवाच्या ठाई असणारी शक्ती ही मनाच्या माध्यमातून एकवटते व त्याचे चांगले अथवा वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम आपल्याला दिसतात.
         संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला सांगतो की, 
मनात करा रे प्रसन्न।। सर्व सिद्धीचे कारण ।।
मोक्ष अथवा बंधन।। सुख समाधान इच्छा ते।।१।।
        म्हणजेच आपली शक्ती मनात असते. कोणतीही घटना घडल्यावर त्यावर आपले मन व्यक्त होते. कधी रडू येते, कधी राग येतो, कधी वाईट वाटते, कधी आनंद होतो, कधी हेवा वाटतो, कधी अभिमान तर कधी प्रेम या सर्व माध्यमातून आपण व्यक्त होतो.
          संवेदनशीलता पण मनाचीच बाजू. एखाद्या प्रसंगात आपण कसे व्यक्त होतो आणि त्यावर काय प्रतिक्रिया देतो याला सोप्या भाषेत संवेदनशीलतेकडे वळवता येईल. आपल्यासोबत किंवा सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत रिऍक्ट होण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ: रस्त्यावर बसलेल्या कुत्र्याला दगड मारल्यावर तो वेदनेने ओरडत असेल तर काहीजण हसतील, काही जणांना गंमत वाटेल, काही जणांना वाईट वाटेल, तर काहीजणांना दया येईल हे वाटणे... हा प्रत्येकाच्या मनातील संवेदनशीलतेचा भाग असतो.
           आपल्याकडे संवेदनशील माणसाला 'इमोशनल' असे गोड नाव दिले जाते व संवेदनशीलता हा त्या माणसाचा weak Point आहे असे भासवले जाते, पण तसे मुळीच नाही आहे. संवेदनशील मन ही खूप मोठी ताकद आहे. मानवी भावना जाणून त्या हळुवार हाताळण्याची ती देणगी आहे. आपण जर खरंच संवेदनशील असू तर तो आपला weak Point नसून Strong plus point आहे. मानसिक दृष्ट्या आपण हळवे असलो तरी आयुष्याची ती मोठी पुंजी आहे. कारण जगात एकटी पडणारी माणसे ही भावनाशून्य आणि असंवेदनशीलच असतात.
             संवेदनशील मनामुळे बऱ्याच वेळेला चिडचिड होते, रडू येत, सगळेच आपल्या विरोधात आहे असे वाटते. सगळे संपले असे वाटते, पण हा आपला चांगुलपणा असतो. सगळे चांगले व्हावे असे वाटणे, आपल्याला किती त्रास झाला तरी समोरच्याबद्दल आपण चांगलाच विचार करतो, कोणी कितीही त्रास दिला तरी आपण चांगल्याच बाजूने विचार करतो हीच आपली ताकद असते.
            ' जशास तसे' या सूत्राने आपण वागत नाही आणि नात्यात व आपल्या जवळच्याशी वागू ही नये. नाहीतर नाती कुमकत होतात. हळू-हळू आपण या मनाच्या चांगुलपणाचा प्रभावी वापर करायला नक्कीच शिकू...
            शेवटी जग हा बाजार आहे. त्यात व्यवहारा वर चालणारी बरीच नाती असतात. त्यामुळे संवेदनशील मनाच्या माणसाची जास्त फसवणूक होत.
         किसी ने क्या खूब कहा है, "जो लोग दिल के अच्छे होते हैं।
 दिमाग वाले अक्सर उनका जमकर फायदा उठाते हैं। 
             पण याचा तोटा चांगल्या मनाच्या माणसाला होत नाही, मात्र संवेदनशील मनाच्या माणसाला फसवल्याचे शल्य फसवणाऱ्याच्या मनात वाढते. संवेदनशीलता ही मनाची प्रचंड शक्ती आहे आणि "अक्सर किस्मत वालो को ही नसीब होती है।"

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com

Saturday, 24 May 2025

भावनाशून्यतेच्या जगात Emotionless World

🌸भावनाशून्यतेच्या जगात..

आकाशगंगेच्या मनात आले नि ग्रहांच्या फिरण्याबरोबर त्यांना नवनिर्मितीचा नाद लागला. मंदाकिनीमधील आठ ग्रहांपैकी पृथ्वीने जगाच्या कल्याणाचे फारच मनावर घेतलं व स्वतःला सजीवांचे निर्मितीसाठी सज्ज केले. वातावरणातील अनेक बदलाचे प्रयोग करून शेवटी पृथ्वीने पाण्यात आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आणि पृथ्वीच्या लेकरांचा गोतावळा वाढत गेला. पृथ्वीवरील सजीवांचा गोतावळा लाखोच्या घरात गेला व या सर्वांना पृथ्वीने मायेने सांभाळले आहे. 
            आपली म्हणजे पृथ्वीच्या सर्वात हुशार लेकराची निर्मिती साधारण 2 ते 5 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली. आपण पृथ्वीवर आलो तेच सर्वांच्यापेक्षा वेगळे आणि त्यात निसर्गाने आपल्यावर इतकी कृपादृष्टी दाखवली की आपण इतर सजीवांच्या तुलनेत बौद्धिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या खूप संपन्न झालो.
            डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांत : नैसर्गिक निवड (Survival of the fittest) हा इतर प्राण्याप्रमाणे आपल्याला लागू होतो. जो सक्षम असेल तो जगण्यास पात्र आहे असे सांगणारा हा नियम जरी असला तरी इतर सजीव व आपल्यामध्ये या नियमाचे अनेक वेगळे पैलू आहेत.
               भावनिकतेच्या जगात इतर सजीवांच्यापेक्षा अतिउच्च टोकावर असणारे आपण इतर प्राण्याप्रमाणे भावनाशून्य अजिबात नाही. सामाजिक आणि भावनिक पातळीवरील जडणघडण आपल्याला इतर प्राण्यांच्यापेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण करत आहे, पण काळाच्या ओघात आपल्यात ही खूप बदल झाले आहेत. माकडापासून माणूस झाल्यानंतर सुरु झालेल्या प्रगतीचा आलेख प्रचंड वेगाने वरती जात आहे. या आलेखानुसार बौद्धिक व सामाजिक स्तरावर आपण डोळे दीपवणारी प्रगती केली आहे, पण भावनिक स्तरावर झालेली अधोगती डोळे शरमेने झुकवणारी ठरत आहे.
             प्रगतीच्या नावाखाली भावनिकतेची होणारी हेळसांड मानव म्हणून आपल्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरू लागली आहे. पूर्वी आपण वस्तू वापरत होतो व माणसांवर प्रेम करून भावना जोडत होतो, पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीत यंत्रामध्ये भावना फुंकता- फुंकता आपल्या माणसातील भावनिकता, माणुसकी कुठे उडून गेली हे आपल्या लक्षातही आले नाही. त्यामुळे आपण सध्या माणसे वापरतोय आणि वस्तूवर प्रेम करू लागलो आहोत.
             प्रगती, प्रतिष्ठा, आत्मनिष्ठ, स्वअभिमान याच्या नावाखाली आपण किती मोठ्या प्रमाणावर भावनिक अध: पतनाकडे निघालो आहे याची जाणीव आपल्याला होत नाही आहे. समाजात सुरू असलेले द्वेष, धर्मात सुरू असलेले कलह, देशांच्यामध्ये सुरू असलेले वाद- विवाद, खोट्या प्रतिष्ठासाठी होणारे गुन्हे, अमानुष छळांचे होणारे समर्थन आणि उदात्तीकरण हे कोणत्या प्रगतीची लक्षणे आहे याचा आपण बारकाईने ठाव घ्यायला हवा.
              सध्या आपल्याकडे बौद्धिक क्षमतेची अजिबात कमतरता नाही, पण माणूस म्हणून आवश्यक असणारी भावनिक क्षमता व सामाजिक क्षमता आपण तपासायला हवी. आधुनिकीकरणात तंत्रज्ञानाच्या अतिउच्च प्रगतीत आपण सजीव म्हणून किंवा माणूस म्हणून असणारी मूलभूत भावनिक कौशल्य विसरायला लावणाऱ्या अनेक घटना दररोज मनाला हेलावून टाकत असतात. त्या घटना वाचत असताना किंवा ऐकताना खरच हे माणसाचे कृत्य आहे का? याचा प्रश्न पडतो.
             प्राणी ही गरज नसताना व आवश्यकतेपेक्षा जास्त शिकार करत नाही, पण आपण माणूस नावाचा प्राणी आपल्या भावनिक विकलांगतेचे दर्शन दाखवून अमानुष अत्याचाराचे उदात्तीकरण सध्या करत आहोत.  हा तोच माणूस आहे का, की ज्याच्या समोर हृदयद्रावक प्रसंगाचे वर्णन जरी केले तरी डोळ्याच्या कडा नकळत पाणवतात हा प्रश्न सध्या उभा राहत आहे.
             तंत्रज्ञानाच्या विकासावर मानवाच्या प्रगतीचा आलेख मोजत असताना समाजातील भावनाशून्यता दाखवणाऱ्या घटना आपल्या भावनिक अधोगतीचे लक्षण आहे. माणूस म्हणून या पृथ्वीचे लाडके अपत्य म्हणून आपल्याला कौतुकाने मिरवायचे असेल तर भावनिकता व सामाजिकतेच्या कसोटीवर खरे उतरून माणुसकीचा आलेख उंचवावा लागेल.

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com 

Digital Disconnect (डिजिटल डिस्कनेक्ट)

🌸 Digital Disconnect (डिजिटल डिस्कनेक्ट)
               परवा अशीच एक मजेशीर, पण विचार करायला लावणारी घटना घडली. सहज एका जवळच्या व्यक्तीने फोन केला आणि विचारले अरे नेट का बंद आहे तुझे???
                 प्रश्न सोपा, सरळ व साधा होता, पण मला ही काहीतरी मोठी चूक झाली असे वाटले, की अरे मोबाईल चे नेट बंद कसे काय ठेवले मी???
               गंमतीचा विषय बाजूला ठेवला तर हा प्रश्न साधा ही नाही, सरळ ही नाही आणि सोपा तर अजिबात नाही, कारण तो आपल्या दैनंदिन जीवनातील यक्ष प्रश्न म्हणून उभा ठाकला आहे. 
          बारकाईने आपणच मोबाईल नावाच्या आरशात आपल्या स्वतःला पाहिले तर त्या मोबाईलच्या प्रेमात आपण नखशिखांत बुडालेलो आहोत याची लख्ख जाणीव मोबाईलच आपल्याला करून देतो. पूर्वी मोबाईल आपल्या सोबत असत होता, पण आता आपण मोबाईल सोबत आहोत. पूर्वी आपल्याला हवे ते मोबाईलवर आपण पाहायचो, पण आता मोबाईलचा algorithm आपल्याला त्याच्यानुसार किंबहुना आपल्या मूडनुसार काय पाहिजे ते दाखवतो. खरेदी करायच्या विषयात पण आपल्याला पाहिजे असणारी गोष्ट मोबाईल मात्र त्याच्या आवडीने आपल्याला खरेदी करायला लावते. 
                या सर्व गोष्टी आता आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्यातील कितीही तोटे व धोके परिचित असले तरी आपल्याला ते धोके पचवून, तोटे सहन करत 'खतरो के खिलाडी' होण्याचा चंग आपण बांधलेला आहे. 
              हे सर्व जरी खरे असले तरी आपण थोडे शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या फोनचे इंटरनेट आता दिवसभर व काही जणांचे तर 24 तास सुरू असते. पूर्वी आपण गरजेनुसार इंटरनेट वापरत होतो. आता इंटरनेट आपला गरजेप्रमाणे वापर करत आहे. महिन्याभराचा डेटा पॅक आपण आवश्यकतेनुसार सांभाळून खर्च करत होतो, पण डिजिटल क्रांती झाली आणि 1.5 GB आणि अनलिमिटेड डेटा च्या मोहपाशात आपण अडकलो. आता कितीही व कसे इंटरनेट वापरले तर ते संपतच नाही या धारणेवर आपण इंटरनेट बंदच्या बटनाकडे फिरकायचे बंद केले आहे. 
                 काही वर्षांपूर्वी whatsapp ला एखादा महत्त्वाचा मेसेज जरी पाठवला तरी ती व्यक्ती ऑनलाईन येण्याची वाट पाहत बसावी लागे किंवा त्याला फोन करून मेसेज बघ म्हणून सांगावे लागे, पण आता मेसेज पडला की लगेच डबल टिक येते म्हणजे मेसेज पोहोचला व आपण निश्चित झालो. आता हे सर्व इतक्या अगवळणी पडले आहे की मोबाईलचे इंटरनेट काही काळ जरी बंद केले तर आपण काहीतरी महत्त्वाचे गमावत आहोत याची टोचणी मनाला लागते. 
                 इंटरनेट व मोबाईलच्या तालावर नाचताना खरंच थोडी विश्रांती आपल्याला हवीच की आणि त्यासाठी दिवसभरात काही काळ इंटरनेट बंद ठेवून हा डिजिटल power nap घ्यायला काय हरकत आहे? नाहीतर हे फार वेळ आपल्याला ठेवता येणार नाही. कारण मोबाईल आपल्याला त्याच्या अदानी प्रेमाच्या जाळ्यात खेचायला तयारच आहे. 
             थोड्या वेळासाठी का असेना पण डिजिटल डिस्कनेक्ट व्हायला हरकत काय आहे? आपण दिवसभर जगाच्या अंगणात दरवळत असतो. डिजिटल डिस्कनेक्ट होऊन काही क्षण स्वतःच्या अंतर्मनात स्वतःला वेळ देण्याची बातच काही और आहे. म्हणूनच म्हणतो 'करके देखो अच्छा लगता है।' 
धन्यवाद!!!

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com

नात्याची घट्ट गाठ (Relationship Bond)

नात्याची घट्ट गाठ 
           दोन सामान्य शेतकरी. सख्खे शेजारी. आपल्या कामात प्रचंड प्रामाणिक उत्साही. दोघे एक दिवस ठरवतात की आपण आपल्या परसबागेत एकाच जातीचे फळाचे रोप लावूया. ठरलेल्या गोष्टीवर अंमल करण्यासाठी दोघांनी नामवंत रोपवाटिकेतून जातिवंत रोपाची निवड करून आपापल्या परसबागेत योग्य पद्धतीने त्याची लागण केली. दोन्ही रोपांचा फुलण्याचा प्रवास सुरू झाला.
           निसर्ग नियमाने दोन्ही रोपे मोठी होऊ लागली. पहिला शेतकरी दररोज त्या रोपाला वेळ द्यायचा. त्याच्या प्रत्येक गोष्टीचे बारकाई निरीक्षण करून त्याची दखल घेत होता. प्रत्येक वेळी अनावश्यक गोष्टी बाजूला काढणे. एखादी फांदी जरी वाकडी आली असेल तर ती काढून टाकत असे. रोग पडू नये म्हणून आधीच त्यावर सर्व प्रकारचे औषध फवारणी. भुंगे, किडे, फुलपाखरू यांचा त्रास होऊ नये म्हणून त्या भोवती बारीकशी जाळी त्याने लावली. एकंदरच शक्य तितके त्यांनी त्या झाडाची काळजी घेऊन त्याला हवे तसेच त्या रोपाचे झाड त्यांने घडवले.
             याउलट दुसरा शेतकरी रोपांची काळजी घेत होता. त्याला पाणी, खत आवश्यकतेनुसार पुरवत होता. रोग आल्यावर आवश्यक तेच औषध फवारणी करत होता. त्याचेही झाड मोठे झाले.
            शेवटी तो हंगाम आलाच. ज्यासाठी या दोघांनी अट्टाहास केला होता. दोघांचीही झाडे मोहराली . दोघेही आनंदी झाले, पण प्रत्यक्ष फळ लागले व त्याचा दर्जा पाहिला तर पहिल्या शेतकऱ्याच्या झाडाला मोजकीच व अत्यंत सामान्य  दर्जाची फळे लागली. उलट दुसऱ्या शेतकऱ्याचे झाड फळांनी वाकले होते व फळांचा दर्जा अपेक्षित दर्जापेक्षा चांगला होता. 
            गोष्ट फळांच्या झाडाची असली तरी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नात्यांची वीण घट्ट करत असताना आपल्याकडून नकळत त्या पहिल्या शेतकऱ्यांसारखे तर होत नाही ना? हे तपासायला हवे. कोणतेही नाते टिकते ते काळजी, विश्वास आणि स्वातंत्र्य यावर आणि ती फुलण्याची शक्यता या तीन गोष्टींच्या तीव्रतेवर अवलंबून असते. कोणती गोष्ट कितीही चांगली असली तरी ती अधिक प्रमाणात झाली तर तिची परिणामकारकता कमी होते किंवा त्याचा परिणाम उलटा व्हायला लागतो.
               कोणतेही नाते असो त्यामध्ये काळजी, विश्वास व स्वातंत्र्य हे प्रमाणात असेल तर ते फुलते, नाहीतर अतिकाळजी किंवा दुर्लक्ष, अतिविश्वास किंवा अविश्वास, स्वातंत्र्य किंवा शिस्तीच्या नावाखाली लावलेली निर्बंध यामुळे नाते कदाचित सोबत राहील पण ते फुलेलच असे नाही. आणि ही गोष्ट दोन्ही बाजूंकडून होणे गरजेचे आहे. नात्यात प्रयत्नांची तीव्रता कमी जास्त झाली तरी दोन्हीकडून मिळून 100% प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यातला आपलेपण निघून मिरवण्यापूर्ती औपचारिकतेची कोरडी झालर शिल्लक राहते. 
             पहिल्या शेतकऱ्यांने नाते जपले, पण ते अतिकाळजी, अविश्वास व शिस्तीच्या नावाखाली निर्बंध लावले.  दुसऱ्या शेतकऱ्याने जपलेले नाते काळजी, विश्वास व स्वातंत्र्य या तिन्ही बाबीवरून तोल सांभाळून होते. म्हणून त्याला त्यात अपेक्षेपेक्षा भरपूर मिळाले. उलट पहिल्या शेतकऱ्याला अपेक्षित गोष्टीही मिळाल्या नाहीत.
         शेवटी नाते कोणतीही असो ते जिवंत घटकांशी संबंधित असते आणि ते टिकवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व दोघांचा समजूतदारपणा गरजेचं असतो. शेवटी टिकवणाऱ्याकडे हजार कारणे असतात नाते टिकवण्याची व न टिकवण्यासाठी एकच पुरेसे असते निघून जाण्यासाठी...

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com

Tuesday, 31 December 2024

आज : Today

📝 आज.......
      आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे मानतात तर काही जण आणखी एक नवीन वर्ष, नवी संधी आली असे मानतात. खरी गंमत वेगळीच असते काही गेलं ,काही येणार आहे म्हणण्यापेक्षा आहे ते Enjoy करणारा खरा शहाणा ठरतो. 
          अर्धा ग्लास बघून अर्धा ग्लास रिकामा कि अर्धा ग्लास भरलेला हे ठरवण्यापेक्षा तो ग्लास पिऊन टाकणारा शहाणा ठरतो. तेच आपल्या आयुष्याच्या बाबतीत ठरते कारण भुतकाळ आपल्याला *निराश* करतो तर भविष्यकाळ काळजी करायला लावतो. पण फक्त आज आणि फक्त आजच आपल्याला जगायला, आनंदी राहायला , आनंदी राहायला शिकवतो. भुतकाळ आणि भविष्यकाळ विसरायला लावणारा तो 'आजचा' क्षण असतो. आणि तो 'आजचा' क्षण आपण 'आजच' जगला पाहिजे. 
          आपण नेहमी ठरवतो, हे करायचे, इकडे जायचे, त्याला भेटायचे, त्याला फोन करायचा, इकडे फिरायला जायचे, हा छंद जोपासायचा. पण हे सर्व प्रत्येक्ष करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपण या सर्वांकडे सोयीस्कर कारणासह अपेक्षित दुर्लक्ष करतो. आणि या सर्वांना योग्य Label  लावून बाजूला करतो. कधी सुट्टी नाही, कधी काम जास्त आहे, आत्ता नको नंतर बघू ,असे म्हणून आपण आपल्याच Emotion चा गळा दाबतो. आणि मग आजच्या सारख्या एखाद्या दिवशी एकटे बसून आठवणी काढून निराश होतो.
         "So कल को मारो गोली, आज अभी आणि आत्ता " जे करायचे ते आत्ता करू, कुणाला भेटायचे आहे ना आत्ता भेटू , कोणाला फोन करायचा ना आत्ता करू, फिरायला जायचे ना आज निघू. थोडक्यात आपले Emotion control करण्यापेक्षा Express करायला आणि आजच करायला शिकले पाहिजे नाहीतर उद्या तो भुतकाळ होईल आणि आपल्या निराशेचे कारण होईल.
               "छोडो कल कि बाते,
                कल कि बात पुराणी।
                छोडो कल कि बाते
                कल कि बात है आनी।
                नए आज में लिखेंगे,
                 हम नई कहाणी।"
           आजच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा थोडासा Thoughtful विचार आज सुचला म्हणून आजच......

आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा💐💐💐
🖋 संदीप.....
sandip.koli35@gmail.com

Sunday, 30 June 2024

Leave while you are at the top of the game

🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏

29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर्षापासून असलेल्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ रोहित आणि टीमने संपवला आणि पूर्ण देशातच एक जल्लोष सुरू झाला. खरेतर सातत्याने इतकं छान क्रिकेट खेळत असताना " हाथ आया लेकिन मुंह ना लगा।" अशी अवस्था भारताची होत होती. गेल्या वर्षभरात भारत तीन वेळा आयसीसी ट्रॉफीच्या फायनल पर्यंत पोहोचला पण यशाला गवसणी घालण्यापासून काही क्षणांनी मात दिली होती, पण आज तो सुवर्णक्षण अवतरला आणि भारतीय टीमने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 
           भारतीय टीम ही सातत्याने अतिशय उत्तम कामगिरी करून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती त्यामुळे आजचा सामना हा भारतीयांसाठी प्रचंड महत्त्वाचा होता. एकीकडे भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्याचा अभिमान आणि कौतुक होत असताना दुसरीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी T20 मधून घेतलेली निवृत्ती ही सुद्धा मनाला कुठेतरी बोचणी लावून जाणारी आहे. भारतीयांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू. 
        पण का??? दोघेही इतका चांगला खेळ खेळत असताना अचानक अशा निवृत्तीची गरज होती का??? त्यांनी अजून काही वेळ वाट बघायला पाहिजे होती का??? 
         नाही.... त्यांनी घेतलेला हा निर्णय माझ्यामते सर्वोत्तम आहे. तुम्ही अशा वेळेला निवृत्ती घेत आहात की ज्या वेळेला तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर असाल तर निवृत्ती तुमच्यासाठी खूप फलदायी ठरत असते. रोहित व विराट सध्या या प्रकारात सर्वोच्च स्थानावर आहेत. अजून काही काळ ते खेळत राहतील. अतिशय उत्तम ही खेळतील यात शंका नाही, पण आज जो क्षण त्यांच्या आयुष्यात आला आहे तो पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही आणि अशा वेळेला सर्वोच्च शिखरावर असताना त्यातून बाजूला होणं ही खूप मोठी उपलब्धि दोघांनी साधली आहे. 
          या निर्णयामुळे ज्या- ज्या वेळेला t20 फॉरमॅटचा उल्लेख होईल त्यावेळी या दोघांची नावे तितक्याच अभिमानाने घेतली जातील. त्यांचा हा निर्णय सर्व क्षेत्राला लागू पडतो. तुम्ही ज्या वेळेला यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतात त्यावेळेला तिथून बाजूला जाणे हेच तुमचे खरोखरच यश असचे. Leave it when you are at peak. 
          रोहित आणि विराट या पुढेही भारतीय क्रिकेटसाठी कसोटी आणि वनडे च्या माध्यमातून योगदान देत राहतील यात शंका नाही. त्यांच्याकडे अजून खूप खेळ बाकी आहे याबद्दल खात्री आहे. दोघांनाही कसोटी व वनडे फॉरमॅटसाठी खूप खूप शुभेच्छा आणि t20 साठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद.....
        भारतीय संघ आणि रोहित टीमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन..

✒️ संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...