Monday, 26 March 2018

चला उभारू करिअरची गुढी

हाय फ्रेंड्स!....  टायटल वाचून गोंधळात पडलात ना? तरुण म्हणजे 'देश की धडकन', लाथ मारेन तिथे पाणी काढणारा समूह,  आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने घेऊन फिरणाऱ्या जिंदा-दिल लोकांचा गट. आपल्या कर्तृत्वाने दुनिया को झुकानेवाला बडे दिल वाले लोक, राष्ट्राच्या जडणघडणील महत्त्वाचा आधारस्तंभ, माँ की आँखो का तारा,  घरातल्या लोकांचा आशेचा दिवा, गल्लीतल्या लोकांच्या नाकाचा शेंडा, कॉलेजची आण, बान आणि शान......
              पण खरेच असे आहे का?  दुसऱ्याकडे नको स्वतःकडे बघूया आपण आपल्या करियर बाबतीत खरंच सिरिअस आहोत काय?  हा प्रश्न पडला असेल, पडत असेल किंवा येणाऱ्या काही दिवसात पडेल. पण या प्रश्नाच्या  उत्तरा आधी आपण काही गोष्टींचा विचार करूया. दिवसाला मिळणारा 1.5 GB मोबाइल डेटा आपल्याला करिअरबद्दल विचार करू देत नाही. हा डेटा संपवायच्या विचारात दिवसभर व्हाट्सअप्प, फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-ट्यूब अशा अनेक सोशल साईट चाळत बसतो. यात आपलेच नुकसान होत आहे. इंटरनेटच्या दुनियेत कदाचित एक आभासी जग आपल्या सभोवती निर्माण होते आपल्याला जे आवडते तेच दाखवते. यात आपण चांगलेच रमलो आहे. तरुणाईला मोबाईल हे साधन आणि पुस्तक हे जीवन आहे हे कळायला हवे.
          आपल्या पुढचा दुसरा मोठा अडथळा म्हणजे "टिनेज प्रेम" सध्याचा सिनेमा व एकंदर मोकळे वातावरण यामुळे प्रत्येकजण स्वतःला परशा समजून आपल्या आर्चीच्या शोधात असतो. गाडीवरून फिरणे, खरेदी, सहवास, आकर्षण या गोष्टी ओघाने येतात. आतून वेळ व पैसा दोन्ही गोष्टी भरपूर खर्च होतात पण हे लक्षातही येत नाही. वयातील बदलाच्या आकर्षणाला प्रेम समजून करिअरची व आयुष्याची होळी करून आयुष्यभर चटके सोसणारी अनेक उदाहरणे आपण अनुभवतो.
         सध्या आपली पिढी असण्यापेक्षा दिसण्यावर आणि दाखवण्यावर भर देते त्यामुळे प्रत्येक गोष्ट हटके करण्यात आपली बरीच ऊर्जा वाया जाते. नवनवीन ठिकाणी जाऊन गाडी,  डोंगर, टेकड्या यावर फोटोग्राफी करण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे. हे फोटो काढून सोशल मीडियावर चांगल्या पंच-लाईन सह फिरवले जातात. लाईक कमेंट व टॅग चा पाऊस पडतो आणि भाऊ खुश होतो.
              गट, ग्रुप, कट्टे, गँग हे ही आहेतच. यात ट्रिप,सिनेमा, वाढदिवसाचे सेलिब्रेशन, पार्टी, बाहेर हँग आऊट, रात्री उशिरापर्यंतच्या गप्पा हे तरुणाईच्या अंगवळणी पडले आहे. घरातून मिळणारे स्वातंत्र्य, पैसे, फिरायला गाडी या गोष्टी आता कॉमन झाले आहेत. त्याबरोबर व्यसने, जाती-धर्माची गणिते, राजकीय कट्टर समर्थक यामध्ये तरुणाईचे पाय खोल रुतले आहेत.
         तुम्ही म्हणाल हे सगळे कौतुक कशासाठी? पण हे करिअरच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर. या सगळ्या विचलित करणाऱ्या गोष्टीमध्ये आपण करिअरकडे दुर्लक्ष करू लागलो आहोत. वयवर्षे 16 ते 24 म्हणजे आयुष्यातली सर्वात महत्त्वाची. लहानपणापासून रचलेल्या संस्काराच्या पायावर आयुष्याची सुंदर इमारत उभी करण्याची सुवर्णसंधी. या वयात दोन्ही पहायला मिळते. थोडा संयम ठेवला तर आयुष्य सुंदर होऊ शकते अन्यथा या वयातील चुका आयुष्यभर आपल्याला आपल्या अपयशाची जाणीव करून देत सलत राहतात. आज मध्ये जगणाऱ्या आपल्या पिढीने थोडा भविष्याचाही विचार करायला हवा. नाहीतर आज जगण्यात उद्या अंधारात जाऊ शकतो. आजचा तरुण स्मार्ट आहे व असलाच पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे कमी-जास्त प्रमाणात भान असले तरी  व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी करिअर हे महत्त्वाचे आहे. स्मार्टनेस व झगमगाट यातील फरक ओळखता आला पाहिजे. आज फोटोजेनिक पेक्षा 'प्रतिभावान' असेल तरच प्राधान्य मिळते हे वास्तव आहे.
         गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने तुमची करिअरची व यशाची गुढी उंच उभारूया. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या प्रेरणादायी शुभेच्छा.....

----------------------------------------------------------
संदीप कोळी

Sunday, 25 March 2018

सक्सेस सिक्सर

तो आला, तो खेळला आणि त्यांना जिंकून दाखवलं. निदहास ट्रॉफीचा भारत-बांग्लादेश फायनालचे  म्हणजे फक्त आणि फक्त दिनेश कार्तिक शो. हातातून गेलेली मॅच D.K ने एकट्याच्या जोरावर जिंकून दिली. बांग्लादेशच्या तोंडचा घास अक्षरशः हिसकावून  घेऊन त्यांना नागिण डान्स ही करू न देता मोकळ्या हाताने घरी पाठवले. १२ बॉल मध्ये ३४ धावा हव्या असताना D.K मैदानात आला त्यानंतर सामना फक्त दिनेश कार्तिकसाठीच होता. ८ बॉल मध्ये २ चौकार व ३ षटकारांची आतिषबाजी करत शेवटच्या चेंडूवर छकडा मारत विजय मिळवला.
          दिनेश कार्तिक रातोरात स्टार झाला. पण D.K च्या या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला तब्बल १३ वर्ष वाट बघावी लागली. कार्तिकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण २००४ मध्ये 'द महेंद्रसिंग धोनी' च्या आधी झाले. आता तुम्ही म्हणाल महेंद्रसिंग धोनी व D.K याची तुलना कशाला? पण ही तुलना नाही हा फरक आहे यश मिळण्यातला. D.K आणि  M.S  दोघांचे सिलेक्शन 'विकेटकिपर बॅट्समन' या एकाच कॅटेगिरीसाठी झाले होते. यात सिलेक्टरची पहिला चॉईस दिनेश होता पण त्याला खेळात सातत्य टिकवता आले नाही. त्यानंतर धोनी आला. आपल्या खेळाच्या सातत्याने आपले टिम मधले व लोकांच्या मनातले स्थान पक्के केले. यशाची शिखरे भर-भर पार केली. धोनी ज्या गोष्टीला हात लावत होता त्याचे यशात रुपांतर करत होता. धोनी म्हणजे यश हे समीकरण झाले. पण यादरम्यान D.K च्या बाबतीत यश त्याला प्रत्येक वेळी हुलकावणी देत होते. दिनेशचे संघात इनकमिंग-आउटगोईग चालू होते. संघात स्थान टिकवण्यासाठी त्याला धडपड करावी लागत होती. दरम्यान तो रणजी व घरगुती सामन्यात आपला खेळ सुधारत होता. मधल्या काळात असे वाटत होते की जोपर्यंत धोनी आहे तोपर्यंत D.K साठी संघात जागा होणार नाही. पण हे वाटणे मोडीत काढत आपली गुणवत्ता सिद्ध करत धोनी असताना संघात परत आला. कित्येक वर्ष तो टीममध्ये होता पण जो मान त्याला मिळायला हवा होता तो मिळाला नाही मात्र या ८ बॉल ने त्याचे आयुष्य बदलून टाकले. या १३ वर्षात स्वतःला घडवले, वाट पाहिली आणि दाखवून दिले की "कौन कहता है, हिरा यु ही चमकता है  निखर ने के लिये उसे भी तराशना पडत है" 
           आपल्या आयुष्यात असे प्रसंग नेहमी येतात. आपण खूप कष्ट घेतो, मेहनत करतो पण यश आपल्या पदरात पडत नाही. आपण निराश होतो पण D.K च्या स्टोरीतून आपण हे शिकलो की आयुष्यात पूर्णविराम सारखे काही नसतेच असतो तो फक्त स्वल्पविराम प्रत्येक वेळी एक नवी सुरुवात आपली वाट बघत असते. गरज असते  ते आपण उठण्याची आणि सुरुवात करण्याची, आपल्यात बदल करण्याची, आणखी प्रयत्न व मेहनत करण्याची. मोठया यशासाठी संघर्षही मोठाच असतो. आणि "संघर्ष जितना बडा हो जीत उतनी ही शानदार होगी" 
          प्रयत्न, सातत्य, बदल आणि सहनशीलता हि यशाची सूत्रे आहेत. तुमचे आयुष्य बदलण्यासाठी एक क्षण पुरे मात्र  यशाचा तो षटकार मारण्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष आणि प्रयत्न करावा लागतो. या अपयशाच्या  काळात स्वतःला सावरणे आणि पुन्हा लढायला उभे राहणे हे कौशल्याचे काम असते. अशावेळी आपण पुन्हा पुन्हा स्वतःला बजावले पाहिजे की "शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही.
             "एम.एस धोनी' सिनेमात एक मस्त डायलॉग आहे आयुष्य क्रिकेट मॅच सारखे असते. यात प्रत्येक बॉल वेगळा असतो कधी तो सोडावा लागतो, कधी डिफेंड करावा लागतो, कधी ड्राईव्ह करावा लागतो, कधी डक करावा लागतो तर कधी तो बॉउंडरी च्या बाहेर जातो. फक्त गरज असते ती तो योग्य बॉल येण्याची. शेवटी सबके लिये....  
"कर दिखाईये कुछ  ऐसा की
दुनिया करना चाहे आपके जैसा"
-----------------------------------------------------------
संदीप कोळी 
sandip.koli35gmail.com

Wednesday, 21 March 2018

सापडलेल्या पाकिटाची गोष्ट

#सापडलेल्या_पाकिटाची_गोष्ट

             सुट्टीचा दिवस होता. आता नोकरदारांच्या घरात सुट्टीचा दिवस म्हणजे पर्वणीच.. दुपारपर्यंत घरातले वातावरण सामसुमच. मग मी च विचार केला कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी म्हणून पुढचा प्रसंग ओढवण्याच्याआधीच घोषित केले की चला "पन्हाळ्याला" जाऊ. घरातली शांतता संपून वातावरण निवळले. जाण्याची तयारी सुरू झाली. मी ही तह जिंकल्यासारखा निश्चिंत झालो.  तयारी आटपून परिवारसह पन्हाळा गडाचा दिशेने कूच केले. चार-साडेचारची वेळ असेल आमची मोहीम गडाच्या दिशेने वेगाने सुरू होती. अजून उन्हाचा जोर असल्याने वाहनांची संख्या रस्त्यावर तुरळकच.हालोंडी ते हेरले दरम्यान रस्तात पाकीट पडले होते. गाडी चालवता आजूबाजूला नजर ठेवायच्या आमच्या चांगल्या म्हणा किंवा वाईट सवयीमुळे रस्त्यात पडलेले पाकीट दिसले. कुतुहलापोटी ते उचलून घेतले मागेपुढे नजर फिरवली तर कुणी त्याचे शोधत आहे किंवा कोणाचे पडले आहे याचा अंदाज नव्हता. आता ते पाकीट  रस्त्यात टाकणेही बरोबर नाही म्हणून सोबत घेऊन पुन्हा आम्ही मार्गस्थ झालो. कोल्हापूर सोडले मात्र पाकिटाचा विचार डोक्यात चालूच होता. या विचारात पन्हाळगडावर पोहचलो. 
               आमच्या घरच्यांना त्या विषयात फारसा रस व उत्सुकता ही नव्हती.  पण माझी सद्सद्विवेकबुद्धी मला थांबू देत नव्हती. दुसऱ्याची वस्तू उघडून पाहणे हा बॅड मॅनर्स आहे पण ते पाकीट उघडल्याशिवाय त्याच्या मालकाचा पत्ता लागणार नव्हता. घरचे मिळालेल्या क्षणाचा आनंद घेण्यात दंग होते. मी मात्र ते पाकीट द्यायच्या विचार डोक्यात घेऊन फिरत होतो. शेवटी शेवटचा सेवेत स्टॉप म्हणून 'तबक उद्यान' गाठले. तिथे गेल्यावर मात्र आपले शिष्टाचार आणि सभ्याचारपद्धती काढून बाजूला ठेवले आणि ते पाकिट उघडले. पाकिटाचा आकार बघून सगळा पसारा त्यातच ठेवलाय ठेवलाय इतके ते भरलेले होते. उघडल्यावर वाटने खरं ठरले. अलिबाबाची गुहा उघडावी तसे ते पाकीट. पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, HDFC बँकेची ३ ATM कार्ड( घरातल्याची पण यांच्याकडेच), SBI बँकेचे ATM, २०-३० व्हिजिटिंग कार्ड, काही चिट्ट्या, आयडेंटि फोटो, छोटी डायरी, पैसे, कॉलेजची फी भरलेली पावती इत्यादी मुद्दे माल  ठासून भरलेला होता. एकूणच भावाचे सगळे बिऱ्हाड पाकिटात होते.या सगळ्या साहित्यावरून पाकीट मालकाचे नाव व गाव  समजले होते पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फोन नंबर हवा म्हणून मी त्यातली डायरी काढली. डायरी पण अजीब होती त्यात स्वतःची काहीच माहिती  लिहिली नव्हती शिवाय एकदम मोडकळीस आलेले मी पाने पलटून नंबर शोधू लागलो पण त्या नावाचा किंवा त्यांच्याशी संबंध असणारा कोणताही नंबर सापडेना शेवटी सुरुवातीपासून नंबर लावायला सुरुवात केली.सध्या पोहचू शकत नाही, बंद आहे, रॉंग नंबर असे उत्तर मिळाल्यावर मी फोन आणि आशा  दोन्ही बाजूला ठेवले व घरच्यांचा रोष यायच्याआधी त्यांच्यात सामील झालो.
           पन्हाळा गड स्वारी यशस्वी झाली. पण ते पाकीट पोचवायचे कसे हा प्रश्न निरुत्तरित होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या डायरीतील काही नंबर ला फोन केले पण काही फायदा झाला नाही. माझ्याकडे नाव व पत्ता होता म्हणून शेवटचा पर्याय म्हणून पोस्टकार्ड पाठवायचा भन्नाट पर्याय सुचला. पोस्टकार्ड आणले पण त्या आधी आणखी एक प्रयत्न करावा  म्हणून पाकीट पुन्हा मोकळे केले. त्यातला प्रत्येक कागद, कार्ड बघितले त्या पसाऱ्यात एक घडी घातलेला कागद सापडला त्यावर बरेच नंबर होते पुन्हा फोन लावले  पहिल्या ६-७ नंबरला काल सारखे रिप्लाय येत होते. त्यानंतर मात्र एक फोन लागला त्याने नाव सांगितल्यावर ओळख पटली. मला हायसे वाटले पण तो म्हणाला या नावाचे चार मित्र आहेत गावात. मग वडिलांचे व कॉलेज चे नाव सांगितल्यावर त्याच्या लक्षात आले. त्याने निरोप पोहचवला ४-५ मिनिटांतच पाकीट मालकाचा फोन आला. कोठे, कधी, कसे सापडले या प्रश्नातून बाहेर पडल्यावर मी विचारले पाकीट घ्यायला येतोस ना? त्यावर वाघाचे उत्तर ऐकून माझ्या डोक्यात जाळ झाला. म्हणाला "आज राहु दे उद्या येतो की मी"  भावनांवर ताबा ठेवत मी शांतपणे म्हणालो अर्ध्यातासात इचलकरंजीत ये व  पाकिट घेऊन जा. नाही-होय करत तासाभरात येतो म्हणाला. मी ठिकाण सांगून फोन ठेवला पण माझ्या डोक्यात विचाराची मारा-मारी सुरु होती. च्यामारी पाकिटाची गरज कोणाला?  कालपासून पाकीट मला सापडून मी अस्वस्थ आहे आणि हा फाकड्या निवांतच. मग मीच मनाची समजूत घालून "छोड यार" म्हणून ठरलेल्या ठिकाणी पोहचलो. सांगितलेल्या वेळेपेक्षा ५-१० मिनिट झाले तरी त्याचा पत्ता नाही म्हणून पुन्हा फोन केला. तर पठ्ठ्या येतोच, आलोच म्हणत २०-२५ मिनिटे घालवली. इकडे माझा पारा चढत होता व मी उलटे अंक मोजून तो खाली आणत होतो. मनात आपल्या चांगले काम करायची हौस होती ना मग धीर धर याबद्दल द्वंद्व चालू  होते. शेवटी बिचारा आला. सॉरी म्हणाला. मी पाकीट काढले आणि त्याच्या हातात दिली सगळे साहित्य आहे का बघ म्हणून सांगितले. त्यांने ही पाकीट शोधण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. एवढी कागदपत्रे कशाला ठेवायची पाकिटात म्हणून मी फुकटचा सल्लाही दिला त्याला तो पटला की नाही कुणास ठाऊक.मी निघतोय  म्हटल्यावर त्याने प्रश्न केला तुम्हाला हे द्यायचे काय? या प्रश्नावर मी काय म्हणावे हे मला समजले नाही मी त्याकडे बघून हसून गाडीला किक मारली आणि  वाटेला लागलो.
           मनात प्रचंड समाधान पसरले होते. एखाद्याची महत्त्वाची वस्तू पोचल्याचा तो आनंद होता. तो कसा वागला याचे काहीच वाटत नव्हते कारण "नेकी कर  और दरिया मी डाल" हे शिकलो आहे. शेवटी एकच फीलिंग होते " कुछ अच्छा करके देखो, बढीया लगता है।"

📝संदीप......

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...