जरा विसावू या वळणावर......
दररोज आपल्याला जाग येते ती
मोबाईलच्या गजरने... डोळे चोळत उठता उठता कधी मोबाईलचा डेटा On होतो कळत ही नाही. मग रात्री 11-12 ला बंद
झालेली नोटिफिकेशनची टिक- टिक पुन्हा भरभर वाजू लागते. सगळी शोधा शोध झाल्यावर
लक्षात येते की रात्रीत फारसं नवीन काही झालेलच नाही. मग थोडेसे हायसे वाटते.
कोणाचा वाढदिवस? कोणाला शुभेच्छा? कोणाचे अभिनंदनाचे स्टेटस ठेवल्यावर आपल्याला प्रवाहात आहे याचे कौतुक
वाटते आणि दिवसाचा प्रवास सुरू होतो.
सकाळचे आपले
आवरून 15 - 20 मिनिटांपूर्वी ठेवलेला फोन पुन्हा हाती
येतो व आपण जगाशी जोडले जातो. स्टेटस, मेसेज आणि
नोटिफिकेशनच्या माध्यमातून मित्र, परिवार आणि दुनिया
आपल्या डोळ्यासमोर दिसते. दिवसभर काम, प्रवास, भेटी, कार्यक्रम या ना अशा अनेक कामात आपण सतत
व्यस्त असतो.
कोणाची भेट झाली की... काय?
काय? च्यापुढे आपला संवाद जात नाही.
आपल्याला गडबड असते. नंतर भेटतो. जरा गडबड आहे. अशा सबबी सांगून आपण काढता पाय
घेतो. समोर असणाऱ्या किंवा आपल्याला भेटावेसे
वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्याला वेळ देता येत नाही.
जगण्याच्या प्रवासात आपण
इतके व्यस्त झालोय की समोर आहे त्याकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करून आपण पुढे
जातोय. एक आयुष्य आहे व आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत हे 100% मान्य, पण हे So Called सगळे मिळवण्यात आपली स्वतःची ओढाताण तर होते, पण
ज्याच्यासाठी आपण धावतोय ते सर्व आपल्याला सापडतही नाही आणि सापडलेच तरी आपले
समाधान होत नाही.
जगण्याच्या
धावपळीत कुठेतरी थोडं थांबून, थोडा विसावा हा तितकाच
गरजेच आहे. जगाचे चक्र हे कायम सुरूच असणार आहे. कितीही जोरात धावलो तरी सर्वच
ठिकाणी असणे व मिळणे कठीणच. फक्त या धावपळीत आपली फरपट होऊ नये इतकेच महत्त्वाचे.
पुढे जाणे हे आपल्या
आयुष्याचे ध्येय असले तरी आपल्या सोबतच्यांना पुढे घेऊन जाणे किंवा आपल्याबरोबर
असणाऱ्यांसाठी वेळ देणं ही तितकच महत्त्व आहे. नंतर फोन करतो. नंतर भेटूया. नंतर
बघूया.
सध्या
गडबडीत आहे, वेळ नाही ही कारणे बाजूला ठेऊया.
जगण्याच्या या शर्यतीत नंतर कुणालाच वेळ मिळत नाही व ती वेळ गेल्यावर अपराधीपणाची
भावना कायम आपल्या सोबत राहते म्हणून नंतरपेक्षा आत्ता बोलूया, आत्ता भेटूया, आत्ता बघूया हे महत्त्वाचे आहे.
गीतकार सुधीर मोघेंच्या गीताच्या
सुंदर ओळी मला खूप आवडतात...
'भले बुरे जे घडून गेले'
'विसरून जाऊ सारे क्षणभर'
'जरा विसावू या वळणावर....
'जरा विसावू या वळणावर....
जगण्याच्या प्रवासात कुठेतरी
थोडासा स्वल्पविराम घेऊन थोडसं थांबून स्वतःसाठी व जवळच्यांसाठी विसावा घ्यायला
नक्कीच हरकत नाही.
संदीप कोळी
No comments:
Post a Comment