Wednesday, 24 June 2020

छ.शाहू महाराज निबंध Essay of Chh. Shahu Maharaj

छ.शाहू महाराज, प्रजाहित व दूरदृष्टीचा राजा

 

                           श्रावण महिन्यातील दिवस. शुक्रवारचा दिवस असल्याने त्र्यंबोली देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांची वर्दळ सुरू होती. एक रथ टेकडीच्या दिशेने चालला होता. इतक्यात उलट्या बाजूने उतारामुळे एक बैलगाडी वाऱ्याच्या वेगाने येत होती. ४ -५ वर्षाचा एक लहान मुलगा रस्ता पार करत होता. बैलगाडीच्या गोंधळात पळण्याच्या प्रयत्नात तो पाय अडकून पडला. घाबरल्यामुळे त्याला उठता येईना. त्याच्या ओरडण्यामुळे रथात असणाऱ्या महाराजांची नजर त्याच्यावर गेली. ती भरधाव बैलगाडी त्या चिमुरड्याला चिरडणार हे लक्षात येताच महाराजांनी रथातून उडी मारली व त्याला उचलून बाजूला घेतले, त्याचा जीव वाचवला. इतक्यात गर्दीतून येणारा आवाज तप्त शिशा सारखा महाराजांच्या कानावर आदळला “महाराज ते महाराचे पोरगे हाय.” तोपर्यंत सारी गर्दी महाराजांच्या सभोवती एकवटली होती. बैलगाडीवाला बैलगाडी कशीबशी थांबवून थरथरत महाराजांपुढे उभा होता. महाराजांनी त्याला माफ केले, पण ते शब्द कानात घुमत होते. महाराजांनी गर्दीला उद्देशून म्हणाले. “मृत्यूच्या तावडीत असताना कसला जातीपातीचा विचार करता, तुम्ही माणसे आहात की हैवान?” असे म्हणून महाराज त्या  मुलाला आपल्या रथातून घेऊन पुढे गेले.

                        ही घटना आहे कोल्हापूर संस्थांनची. महाराज म्हणजे दस्तुरखुद्द छत्रपती शाहू महाराज. एक सामान्य मुलासाठी आपला थाट बाजूला ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे लोकराजे.

                       सह्याद्रीच्या कणखरतेचे, निर्भीडतेचे प्रतीक असणारा महाराष्ट्र, गोदा, कृष्णा, वारणेच्या शीतलतेने संपन्न झालेला महाराष्ट्र, संतांच्या आचार व विचाराने संपन्न झालेला महाराष्ट्र. याच मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रोवला, स्वराज्य वाढवले, घडवले व जोपासले. रयत सुखी करण्यासाठी आयुष्यभर झटले. हेच स्वराज्य मोठे करण्याचे शिवधनुष्य पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी पेलले. या सर्व स्वराज्य व सुराज्याचा कळस झाले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात आपल्या कार्याचा व कार्यपद्धतीचा ठसा ठळकपणे उमटवणारे लोकराजे म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज.........

                       राजा म्हणजे प्रजा आणि सुखी प्रजा म्हणजे सुखी राजा ह्या सूत्रावर आयुष्यभर जगणारे व त्याप्रमाणे वागणारे राजे म्हणजे शाहू महाराज.

 बोले तैसा चाले | त्याची वंदावी पाऊले ||

अंगे झाडीन अंगण | त्याचे दासत्व करीन ||

त्याचा होईन किंकर | उभा ठाकेन जोडोनी कर ||

तुका म्हणे देव | त्याचे चरणी माझा भाव||

                      तुकाराम महाराजांच्या या सुंदर ओळी जणू महाराजांच्या व्यक्तित्वाचे, गुणाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठीच लिहल्या आहेत असे वाटते.

                       ज्या काळात तत्कालीन सर्व राजे चैनविलासात व ऐशोआरामात जगून आपल्या वैभव व राजेशाही थाटाचे दर्शन सर्वांना करून देत होते, त्यावेळी कोल्हापूर संस्थानचे लाडके शाहू महाराज आपला राजपाट सांभाळून सर्व दिखावा, वैभव बाजूला ठेवून आपल्या रयतेसाठी अहोरात्र झटत होते. रयत सुखी झाली पाहिजे याचा सतत विचार महाराजांच्या डोक्यात सुरू असे. शाहू महाराज राजे झाल्यापासून सुरू झालेला हा प्रवास त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू होता.

                        महाराज म्हणजे आदर्शाचा जिवंत झरा होते. साधेपणा, वक्तशीरपणा, नम्रता, दातृत्व, माया, प्रजाहित, दूरदृष्टी, कौशल्य, कर्तृत्व, पराक्रम, शालीनता, बुद्धिमत्ता, व्यवहारज्ञान, हजरजबाबी, न्यायप्रिय, सर्वसमानता, गुणपारखता अशा अनेक गुणांचा एकत्रित कुंभ म्हणजे शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज या वेळी गादीवर आले, तोपर्यंत ब्रिटिशांनी सारा हिंदुस्तान पोखरून काढला होता. महाराज कोल्हापूरचे राजे झाल्यावर लढाई करणे, स्वाऱ्या करणे असे काहीच नव्हते. त्यामुळे महाराजांनी आपली सर्व शक्ती व कर्तृत्व आपल्या प्रजेसाठी एकवटली. राजा झाल्यापासून महाराजांच्या कार्य पत्रिकेतील सर्वात वरचा विषय म्हणजे प्रजाहित. या प्रजाहितासमोर महाराजांना सर्व गौण वाटत असे. त्यांच्या कारकिर्दीत असे अनेक छोटे-मोठे प्रसंग घडले की ज्यांनी राजांचे आपल्या रयतेवरील प्रेम दाखवले.

                     पहिल्या महायुद्धाच्या वेळीचा प्रसंग. किर्लोस्करांचा लोखंडी नांगर तयार करण्याचा कारखाना होता. त्यासाठी लागणारे लोखंड इंग्लंडवरून यायचे, पण युद्धामुळे १९१६ मध्ये हे लोखंडे येणे बंद झाले. बरीच तडजोड करून त्यांनी काही दिवस कारखाना चालवला, पण नंतर तेही शक्य होईना. कारखाना बंद पडला, तर मजूर बेकार होतील शिवाय शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले असते, पण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी लक्ष्मणराव व शंकरराव किर्लोस्कर यांनी खूप विचार केला. त्यांच्या असे लक्षात आले की कोल्हापूर संस्थानातील किल्ल्यावर बऱ्याच जुन्या तोफा गंजत पडल्या आहेत. शंकररावांनी कोल्हापूर गाठले. महाराजासमोर नम्रपणे आपला विषय मांडला. “युद्धामुळे लोखंड मिळत नाही म्हणून नांगर बनवण्यासाठी तोफा हव्यात.” हे शब्द ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता महाराज म्हणाले, “शेतकऱ्यांच्या उपयोगी जर त्या तोफा पडत असतील तर द्या त्यांना द्या. किर्लोस्कर शहाणा माणूस आहे.”  हे शब्द ऐकून शंकररावांचे हृदय भरून आले. एक दमडीही न घेता तोफा किर्लोस्करांना देण्यात आल्या. राजा म्हणून राजाचे जीवन न जगता शाहू महाराजांनी  आपले राजेपण केवळ जनतेच्या हितकल्याण- सुखासाठी वेचले.

                        शाहू महाराजांच्या डोक्यात सतत रयतेचा विषय सुरू असे. शाहू महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज यांचा विवाह बडोद्याचे गायकवाड यांच्या कन्येशी निश्चित झाला होता. देण्या-घेण्यासंबंधी बरीच खलबते झाली. वधुपक्ष दागदागिने व इनामी गावे द्यायला तयार होते, पण शाहू महाराजांना ८ लाख रुपये हवे होते. जे वधूपक्ष देत असलेल्या मालमत्तापेक्षा 3 लाखांनी कमी होते, पण शाहू महाराज ८ लाखावर ठाम होते. शेवटी न राहून महाराजांचे बंधू बापूसाहेब महाराज यांनी राजांना ८ लाख मागणी बद्दल विचारले. शाहू महाराज म्हणाले, “आमचं संस्थान छोटं, त्यामुळे उत्पन्न कमी. शेतसारा वाढवून उत्पन्न वाढवले तर गरीब भरडणार म्हणून मी ८  लाख रुपये हुंडा मागतोय. दागदागिने व इनामी गावे विकून पैसा करणे शोभेल का?” या उत्तराने महाराजांचे बंधू गहिवरले.

                       या प्रसंगावरून महाराजांचे प्रजेविषयीची प्रेम व काळजी सतत दिसते. आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नात वरबाप होऊन थाटात मिरवण्यापेक्षा तिथेही प्रजाहित कसे जपावे हे महाराजांनी दाखवून दिले.

                      दिपावलीचा गोड दिवस होता. कोल्हापूर समईच्या मंद प्रकाशाने उजळून निघाले होते. महाराज सर्व आटपून नेहमीप्रमाणे गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले तेव्हा, त्यांची नजर एका ९-१० वर्षाच्या मुलावर खिळली. त्याची चौकशी केल्यावर कळले की तो रथाच्या मागे उभ्या असणाऱ्या नोकराचा मुलगा रामू. वडिलांचा डबा द्यायला आला होता. महाराजांनी डबा बघितला दोन भाकरी व झुणका पाहून महाराजांना वाईट वाटले. आख्खे शहर गोडात असताना माझ्या सेवकाच्या घरात दारिद्र. मुलाचे कपडे पाहून राजांच्या हृदयाने अश्रूंचा किनारा कधीच ओलांडला होता. पूज्य साने गुरुजी म्हणतात,

“इवलासा अश्रू , पर्वत बुडवी

 जीवाला चढवी, मोक्षपदी

   इवलासा अश्रू , परी वज्रा चूरी

पाषाणाचे करी, नवनीत”

                अगदी असेच घडले महाराजांच्या हृदयातील अश्रूंनी त्या रामूचे जीवन बदलले. महाराजांनी त्याला नवीन कपडे व घराला पुरेल एवढा फराळ बांधून देऊन आपल्या रथातून घरी पोहचवले.    

                        शाहू महाराज कधीही मनोरंजनासाठी शिकार करत नव्हते. ज्या ठिकाणी जंगली जनावरे शेतीचे नुकसान करीत किंवा हिंस्त्र श्वापदे लोकवस्तीत घुसत त्यावेळी महाराज आपल्या प्रजेच्या हितासाठी शिकार करत होते.

                        दलित समाज अस्पृश्य त्यांना कोणी जवळ घेत नव्हते अशा लोकांना महाराजांनी आपल्या राजवाड्यात तसेच न्यायालय, तलाठी म्हणून नोकऱ्या दिल्या. फासेपारधी  समाजावरील चोरीचा शिक्का पुसावा म्हणून त्यांना आपल्या नोकरीत घेतले. राजांच्यादृष्टीने सर्व प्रजा सारखीच होती. या घटना राजांचे प्रजाहित अधोरेखित करतात. राजाप्रमाणे प्रजाही महाराजांवर तेवढेच प्रेम करत होती किंबहुना राजांना पुजत होती. पुढील ओळी हेच प्रेम दाखवतात.....

श्री शाहूनृपाची सेवा अमुचा ठेवा 1

शाहूविण दुसऱ्या आम्ही न भजतो देवा 11

                    महाराज करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत दूरदृष्टीकोन होता. महाराजांच्या दूरदृष्टीत प्रजेचे कल्याण लपले होते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे राधानगरी धरण. शिकारीसाठी दाजीपूरच्या जंगलात भटकताना तेथील लोकांशी संवाद साधल्यावर राजांच्या असे लक्षात आले की शेतीला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी भोगावती नदीवर धरण बांधले तर पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. १९०९ रोजी ३० लाख रुपये खर्च गृहीत धरून हे काम सुरू झाले. महाराणी लक्ष्मीबाई तलावाचे बांधकाम दगड व चुना वापरून करण्यात आले. महाराजांनी आपल्यासाठी एक मजबूत व स्थापत्यशास्त्राचा एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा ठेवून गेले आहेत. आज १०० वर्षांनंतरही धरण त्याच मजबूत स्थितीत व पाण्याची गरज भागवत आहे ही बाब महाराजांचा दूरदृष्टीपणा दर्शवते.

                      कोल्हापूरला वसतिगृहांची सुवर्णभूमी ही ओळख महाराजांनामुळे मिळाली. शिकणाऱ्या मुलांची राहण्याची सोय व्हावी या दूरदृष्टीतून महाराजांनी कोल्हापूरमध्ये वसतिगृह सुरू केली. १९०९ ला मराठा वसतिगृहाची सुरुवात एका मोठ्या बदलाची नांदी होती. त्यानंतरही वसतिगृहाची साखळी अशीच सुरू राहिली. जैन, मुस्लिम बोर्डिंग, लिंगायत, अस्पृश्य, दैवज्ञ, श्रीनामदेव, सारस्वत ब्राह्मण, वैश्य समाज, इंदुमती राणीसाहेब अशा अनेक वसतिगृहाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत कोल्हापुरात किंबहुना महाराष्ट्रच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून शिकण्यासाठी या वसतिगृहाची दारे कायम खुली आहेत. राजांच्या दूरदृष्टीने आज १०० वर्षानंतर ही तितकाच फायदा शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना होत आहे.

                     महाराजांच्या दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण म्हणजे कोल्हापूरत १९१६ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले होते. माझा बहुजन समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे या ऐका तळमळी  पोटी जे पालक मुलांना  शाळेत पाठवणार नाही त्यांना प्रतिमहा १ रुपये दंड ठेवला होता. शाहू महाराज म्हणत.... “माझ्या संस्थानातील सर्वजण साक्षर झाले तर मी हे संस्थान प्रजेच्या स्वाधीन करेन.”

                     महाराजांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर-मिरज रेल्वे. मिरज या त्या काळच्या महत्त्वाच्या ठिकाणापर्यंत रेल्वे जोडण्याचे काम १८८८ मध्ये महाराजांच्या हस्ते सुरू झाले. महाराज १९०२ मध्ये परदेशात गेले होते. त्यावेळी रोम शहरास भेट दिल्यावर तेथील प्राचीन आखाडे पाहून त्या वेळी ठरवले होते की कोल्हापुरात आपण असाच आखाडा बांधू व त्याच दूरदृष्टीतून ‘खासबागचा’ उदय झाला. आज संपूर्ण भारतात कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूर व खासबागचा उल्लेख होतो तो फक्त महाराजांच्या दूरदृष्टीमुळे.

                        याशिवाय नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण, सहकारी नियोजन कायदा, कोल्हापूर बंधारे, तलाठी पद्धत, बलुते पद्धत रद्द, गुन्हेगारी जमाती हजेरी कायदा बंद, महार वतने बंद, शाहू मिल अशा अनेक गोष्टी शाहू महाराजांची दूरदृष्टी दाखवतात.

                        कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू महाराज म्हणजे बलदंड रूप व कोमल हृदयी होते. त्यांच्या हृदयात माणुसकीचा, प्रेमाचा व समभावाचा अखंड झरा वाहत होता. महाराजांनी २८ वर्षे केलेल्या राज्यकारभारात आपली प्रजा व कोल्हापूर संस्थानाच्या विकास याचा सातत्याने विचार केला. आपल्याकडे आलेल्या व प्रसंगी भेटलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम केले. महाराजांची घडवलेल्या अनेक रत्नापैकी एक रत्न प्रतिभासंपन्न कवी ‘सुमंत’ राजांचे वर्णन काव्यात करताना लिहतात...

“ती भव्य अशी होती मूर्ती तयांची |

भव्यचि तत्प्रकृतीही  साची |

बहु उग्र दिसे जरी तयाचे रूप |

तरी कोमल हृद्यअमूप |

वक्राला होई वक्र |

विष्णूचे सुदर्शन चक्र |

भूतात  भूप जणू शुक्र |

क्षणि दैवबळे गिळी नक्रसम काळ |

छत्रपती शाहू नृपला ||

                     महाराजांनी आपल्या विचारांमुळे संस्थांनात धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल केला केला व त्यामुळेच ते राजर्षी बनले. प्रजाहित व दूरदृष्टी सदैव डोळ्यासमोर ठेवल्यामुळे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात लोकप्रिय बनले. त्यांच्या विचाराने व दूरदृष्टीने संपन्न कोल्हापूर आज देशातील अग्रगण्य आहे. या विचार संपन्न छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरचा मी भाग आहे याचा मला दृढ अभिमान आहे.

 ----------------------------------------------------------------------------------------------------------

संदीप कोळी.

9730410154 

sandip .koli35@gmail.com



हम हिंदुस्तानी We Are Indians

हम हिंदुस्तानी

 

छोडो कल की बाते

कल की बात पुरानी

नये दौर में लिखेंगे

मिलकर नयी  कहानी

हम हिन्दुस्तानी

                            हे गाणं आपल्याला नेहमीच प्रेरित करते. या गाण्याचे शब्द आपल्या चेहर्‍यावर अभिमान आणि अंगावर रोमांच उभे करतात. आपल्या कार्यानेकर्तृत्वाने आपण सामर्थ्याच्या जोरावर आधुनिक भारताची बांधणी करून नवनिर्माण करू शकतो हा विश्वास निर्माण करतात. नव्या व आधुनिक भारताचे आपण शिल्पकार आहोत ही भावना वाढीस लावतात. आपले रक्त देशभक्तीच्या भावनेने सळसळू लागते व देशासाठी आपल्या जीवाची बाजी लागली तरी हरकत नाही याचा अभिमान वाटू लागतो.

                        आपण भारतीय असण्याच्या ओळखीला पूर्ण जगभरात आदराने पाहिले जाते. आपली गुणवत्ता व कौशल्य या गुणांची दखल संपूर्ण जगाने घेतली व अनुभवली आहे.

      आता आपल्याला प्रश्न पडला असेल हे आजका ?

 देशभक्ती सारख्या एकदम जिव्हाळ्याच्या विषयावर का?

                      उत्तर सोपे आहे. सध्या दोन युद्धजन्य व तणावजन्य परिस्थिती सुरू आहेत.  एक भारत-चीन सैनिकांमध्ये दोन्ही देशांच्या सरहद्दीवर तर दुसरे आपल्या-आपल्यातच म्हणजे व्हाट्सअप,फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल माध्यमावर. आता तुम्हाला विषय व संदर्भ दोन्ही लक्षात आले असेल. आतापर्यंत खूप सार्‍या चर्चेतून हा विषय ढवळून निघाला आहे, पण या सर्वात आपली भूमिका काय हे खूप महत्त्वाचे आहे.

                           आपल्याकडे गुणवत्ता, मेहनत, सचोटी, निष्ठा यासारख्या गुणांची अजिबात कमतरता नाही, पण यशाचे शिखर आपण अजून गाठले नाही. यातच चीन  सारखे महत्त्वाकांक्षी शेजारी सुसाट वेगाने पुढे चालले आहे. आता गरज आहे आपली देशभक्ती दाखवण्याची आणि देशभक्ती जगण्याची. शाहरुख खानच्या ‘चक दे’ सिनेमातील एका प्रसंगाप्रमाणे आपण राज्याचे, गावाचे प्रतिनिधी नसून प्रथम भारताचे आहोत हे दाखवून देण्याची. राष्ट्रसेवेला पूर्णवेळ वाहून घेणे किंवा बॉर्डरवर जाऊन सैनिकाप्रमाणे लढणे प्रत्येकाला शक्य नाही, पण आपण करत असलेले काम व आपली कृती राष्ट्राच्या हितासाठी असणे खूप महत्त्वाचे आहे.

                         आपल्या प्रत्येक काम हे राष्ट्राच्या सदुपयोगी पडेल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. आपल्या बुद्धीच्या व गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्राला पुढे नेण्यासाठी झटले पाहिजे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ते फक्त प्रतिज्ञासाठी लक्षात न ठेवता ते आचरणात आणले पाहिजे. शक्य तितक्या स्वदेशी गोष्टींचा वापर व कमीत-कमी विदेशी वस्तू वापरायला हव्यात. अशा विदेशी वस्तूला पर्यायी स्वदेशी वस्तू निर्माण करायला हव्यात.

                           देशभक्ती हा साजरा करायला काही Event,उत्सव नाही तर ती आपल्या जगण्याची सवय बली पाहिजे. कधीतरी अशा युद्धजन्य व तणावजन्य परिस्थितीत दिवाळी-ईद सणाप्रमाणे ती उफाळून  येण्यापेक्षा ती आपल्या आचरणात आणली पाहिजे.जपान सारख्या देशाच्या प्रगतीचे जेव्हा आपण दाखले देतो, त्यावेळी त्यांच्या यशाचा खरा पाया हा देशभक्ती व प्रचंड देशप्रेम हाच आहे.

                          दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपली योग्यता वाढवणे हाच खरा उपाय आहे. दुसऱ्याचा वेग कमी करण्यापेक्षा आपली गती वाढवणे हे यशस्वी देशाचे लक्षण आहे. सर्वात तरुण देश म्हणून जग आपल्याकडेच पाहते तो विश्वास आपण खरा करून दाखवला पाहिजे. देशभक्तीची ज्योत आपल्यात कायम तेवत ठेवली पाहिजे.

                   शेवटी देशभक्ती म्हणजे देशाच्या हितासाठी व त्याच्या सार्वभौमत्वासाठी सदैव तत्पर राहणे हाच खरा राष्ट्रधर्म आहे. फक्त सोशल मीडियावर भांडून, पोस्ट फॉरवर्ड करून देशभक्ती दाखवण्यापेक्षा आपल्या आचरणातून ती जगली पाहिजे. कारण देशभक्ती ही दाखवण्याची नाही तर जगण्याची बाब आहे. बाकी आपण भारतीय एक आहोच.

 ------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदीप कोळी.

9730 410154

sandip.koli35@gmail.com


 

Thursday, 4 June 2020

जागतिक पर्यावरण दिन World Environment Day


जागतिक पर्यावरण दिन......

आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन.....

मागची एक जुनी आठवण आजच्या पर्यावरण दिनानिमित......
                   सुट्टीत बाहेर गेलो होतो. नेहमीचच कोकण.... रस्त्याच्या कडेला गुरे चरवायला आलेल्या आजी जवळ थांबलो. थोड़ी विश्रांती व थोड्या गप्पा मारायच्या म्हणून..... थोडा वेळ गप्पा झाल्यावर सहज विचारले " "आजी पावसचं कस यंदा"........ 
                   आजी पण तिच्या शैलीत म्हणते " कसं म्हंजी बाबा पड़ायला पहिजीच की..... तुमी शेरातली माणस आणि त्यात पगारवाली मग काय तुमासनी न्हाइ लागत खर आमासनी पाऊस पहिजेच की" आता यावर काय म्हणायचे म्हणून मी म्हणालो "आजी आमी बी पानीच पितोय की " आणि नंतर निघालो.
                 पण खरच पाऊस जसा शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तस तो आपल्या सर्वाच्याही आहे फ़क्त आपण त्यावर प्रत्यक्ष अवलंबून नसल्याने पिण्याच्या व घरगुती वापराव्यतिरिक्त पाणी आपल्याला फारसे लागत नाही.
                पण त्या वाक्याचे मला फार अप्रूप वाटले. जेवढया आतुरतेने आपण 7 व्या वेतन आयोगाची वाट पहिली त्याहीपेक्षा कित्येक पटीने ग्रामीण भागातील लोक ज्याचा Direct संबंध शेती, गुरे यांच्याशी आहे त्या पाऊसाची वाट पहतायत.
              झाड़ लावले पाहिजे  जगवली  पाहिजे याचे संदेश आपण गेली आठवडाभर व आजतर जास्तच सामाजिक भान दाखवत शेयर करतोय पण प्रत्यक्षात कृति किती झाली हे खूप महत्तवाचे....
               माझ्या एका झाड़ने खूप मोठा फरक पडणार नाही पण आपल्या सगळ्याच्या एका एका झाडाने नक्कीच खूप मोठा फरक पडेल..... त्या अजीच्या डोळ्यात अपल्याकडून आपल्याकडून काही अपेक्षा दिसल्या नाहीत पण तिच्या बोलक्या डोळ्यात उद्याची काळजी नक्कीच दिसत होती.... 
               आपण so called सुशिक्षित लोकांनी निदान "ती उद्याची" काळजी मनावर घेऊन एका चांगल्या बदलाची सुरुवात करून आपले भविष्य सुरक्षित करुया. मी झाड़ लावूनच हा अनुभव आपल्या बरोबर शेअर केला आहे. तुम्ही पर्यावरण दिन कसा साजरा करता मला माहित नाही पण.....
झाड़ लावून बघा...
                                अच्छा लगता है।
------------------------------------------------------------------------------------------------------------------
© संदिप कोळी .....
9730410154
sandip.koli35@gmail.com


Monday, 1 June 2020

नमस्कार सांगा Say Hello

नमस्कार सांगा…..

                 नमस्कार सांगा…… हे शब्द काही जणांनी वापरले असतील, काही जणांनी ऐकले असतील आणि कदाचित काही जणांना माहीत नसतील.

                नमस्कार सांगा’…… फार वर्षांपूर्वी असं मी म्हणणार नाही, पण काही वर्षांपूर्वी वापरात असणारा शब्दप्रयोग. दोन व्यक्ती भेटल्यानंतर आपुलकीने एकमेकांशी बोलल्यानंतर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींविषयी नक्की विचारपूस हो व त्यावेळी त्यांना माझा नमस्कार सांगा हा शब्दप्रयोग आपोआप तोंडातून येत होता. शिवाय पत्रव्यवहार तर या वाक्यासाठी राखीव जागा असत होती. नवीन फोन आल्यावर सुरुवातील काही काहा शब्दप्रयोग सुरू होता, पण नंतर मात्र हळूहळू तो सगळीकडूनच गायब होत गेला. आता हा शब्द प्रयोग वापरायचे दूर पण ऐकायलाही मिळत नाही.

              तुम्ही म्हणाल हे काय नवीन? आणि याचा संबंध काय?....

सांगतो....... काही शब्द ना आपल्या खूप जवळचे असतात. आपल्या लहानपणापासून किंबहुना आपल्याला कळायला लागल्यापासून त्या शब्दांच्या सहवासात आपण घडत असतो. मोठे होत असतो. आपल्या बोलण्यात, भाषाशैलीत त्याचा वावरमुक्तपणे व नियमित असतो पण कालांतराने असे लक्षात येते की आपल्या बरोबर असणारे हे काही विशेष सोबती शब्द काळाच्या ओघात आपली साथ कधीच सोडून बाजूला गेलेले असतात. कधी-कधी नामशेष झालेले असतात. त्या शब्दावर खूप प्रेम करणारे आपणही नकळत नवीन शब्दांच्या गर्दीत त्यांचा हात सोडून कधीच पुढे आलेलो असतो आणि मग असेच कधीतरी त्यांची आठवण होते आणि मनात या शब्दाविषयी आपलेपणा खूप वाटू लागतो, पण त्याला खूप उशीर झालेला असतो पुन्हा त्यांचा वापर आपल्यालाही अवघडल्यासारखा वाटतो आणि मग या आवडत्या शब्दांच्या आठवणीत रमण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

                 याप्रमाणे अनेक शब्द भाषा बदलाच्या टप्प्यावर नामशेष झाले आहेत. कदाचित हा भाषा बदल व वापराचा परिणाम असेल, पण असे बरेच शब्दप्रयोग पिढी जोडण्याची दुवे म्हणून कार्यरत होते. बोलण्यासाठी, संभाषणासाठी, लिखाणासाठी त्यांना एक विशिष्ट मानाचे स्थान होते. हे वाचत असताना तुमचे मनात असे काही शब्द, शब्दप्रयोग, म्हणी, वाक्यप्रचार नक्की आले असतील जे तुमच्या सध्या वापरात नसले तरी आठवणीच्या कोपऱ्यात नक्कीच विशेष स्थानी असतील. अशा शब्दांची पुन्हा आठवण करून त्यांना उजाळा देऊया. तुमच्या आठवणीतील तुमच्या जवळचे पण सध्या कालबाह्य शब्द कोणते हे मला नक्की कमेंट करून सांगा........

धन्यवाद.....

------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी

9730410154

sandip.koli35@gmail.com


 


आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...