Monday, 29 March 2021

You don't even notice... : आपल्या लक्षातही येत नाही...

 

आपल्या लक्षातही येत नाही......

              आपल्या दररोज पाहण्यातील झाडांची शरद ऋतूत पानगळ होऊन वसंतात नवी पालवी येऊन ती झाडे पुन्हा बहरून जातात आपल्या लक्षातही येत नाही......

               घराच्या शेजारी एखाद्या झाडाच्या फांदीवर इवलीशी चिमणी अथक प्रयत्नाने छोटेसे इमले बांधून त्यात छोटी अंडी देऊन पिलांना जन्मही देते. चिवचिवाटाने गजबजलेले ते घरटे कधी रिकामे होते हे आपल्या लक्षातही येत नाही....

               घराच्या परसबागेत आपण प्रेमाने लावलेल्या फुलाच्या रोपाला नाजूक कळ्या लागून त्याची सुंदर फुले उमलून कधी कोमेजून गेली हे आपल्या लक्षातही येत नाही....

              लहानपणी एखादा पदार्थ, एखादे फळ कधी बाजारात येते याची आतुरतेने वाट पाहणारे आपण आता ते फळ, तो पदार्थ बाजारात येऊन गेला तरी आपल्या लक्षातही येत नाही....

              होय या निसर्गचक्रातील बाबी आहेत कधी आपल्या लक्षात येतात कधी नाही. कामाच्या व्यापात आणि मोठेपणाच्या ओझ्याखाली आपण गुरफटले गेले आहोत त्यामुळे हे घडणारे बदल आपल्याला फारसे महत्वाचे वाटत नाहीत.

              घडणारे हे बदल आपल्या सभोवती घडत असतात त्याचा परिणाम आपल्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या होतच असतो याबरोबरच आणखी एका महत्वाच्या बाबीकडे आपण सध्या दुर्लक्ष करत आहोत ते म्हणजे आपला जवळचा सोबती मोबाईल.......

              मोबाईल, तुम्ही म्हणाल शक्यच नाही. श्वासाप्रमाणे प्रत्येक क्षणाला मोबाईल सदैव आपल्या जवळच असतो व आहे. आई आपल्या इवल्याशा तान्हुल्याच्या जेवढी जवळ असते तितकेच आपण मोबाईलच्या जवळ असतो, पण मुळातच मुद्दा हा आहे की आपला मोबाईल आपल्या जवळ असतो पण त्यातील सर्वच गोष्टी आपण बारकाईने बघत नाही.

               होय, तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या याच अनेक गोष्टी आपल्याकडून दुर्लक्षित झाल्या आहेत. विश्वास वाटत नसेल तर तपासून बघा........

              आपल्या whatsapp च्या chat मधील आपल्याशी नेहमी संपर्कात असणारा आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा इतर व्यक्ती कित्येक महिने आपल्या संपर्कातच नाही, पण ही गोष्ट आपल्या लक्षातच आलेली नाही....

           आपल्या जवळच्या कित्येक लोकांना आपण गेली कित्येक महिने संपर्कच केलेला नाही. फोन, मेसेज, मेल अशा कोणत्याच माध्यमातून संपर्क केलेला नाही.

           facebook किंवा insta वर आपली प्रत्येक पोस्ट like करणाऱ्या एखाद्याची profile तिकडून delete झाले आहे हे आपल्याला समजलेच नाही.

           सध्या तंत्रज्ञानाच्या संपर्कात नसलेला व्यक्ती म्हणजे इतरांच्या दृष्टीने त्याचे अस्तित्व शून्य झाले आहे.  

           जगण्याच्या धावपळीत आपण इतक्या वेगाने पळत आहोत की आपल्या सोबतचे कित्येक सोबती कधीच मागे पडले आहेत हे आपल्या ध्यानातच आलेले नाही आणि आपण कशासाठी धावतोय हे तरी कुठे लक्षात येतय आपल्या....

            तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपण त्यावर काळजीची जबाबदारी सोपवून आपण बेजबाबदार झालो आहोत. त्यामुळे एखाद्या व्यक्ती, मित्र, मैत्रिणी व इतरांविषयी वाटणारी आपुलकी, काळजी, आठवण या तंत्रज्ञानात कुठेतरी हरवली आहे.

             काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाच्या विळख्यात ती हरवण्याआधी ही निसटलेली कडी आणि हरवलेली नाती शोधायला हवीत.  

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

Friday, 26 March 2021

Jagatguru Saint Tukaram Maharaj : जगतगुरू संत तुकाराम महाराज

 

जगतगुरू संत तुकाराम महाराज 

जे का रंजले गांजले

त्यासि म्हणे जो आपुले !

तोची साधू ओळखावा

देव तेथीची जाणावा  !!

                            संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले ( मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती.

                       तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप श्रीविठ्ठलत्यांना भेटला असे मानले जाते.

                     तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.

                 पंढरपूरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. जगतगुरू  तुकाराम लोककवी होते. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली.

                      सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची  मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.

                    तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपारिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

 

                  भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

 

                  महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते.

                       १९ मार्च  १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो.

                  जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले.. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

 

 

 

Tuesday, 23 March 2021

Holi(Spring Festival) : होळी ( वसंतोत्सव )

 

होळी ( वसंतोत्सव )

             निसर्गात बदलाची चाहूल लागते. झाडांची पानगळ होऊन नवीन सोनेरी पालवी झाडावर दिसू लागते अशा वेळी वसंत ऋतूत हिंदू धर्म परंपरेने साजरा केला जाणारा ‘होळी’ हा एक महत्वाचा व मोठा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते.  वसंत ऋतू च्या स्वागतासाठी सुद्धा होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी सगळे वातावरण खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असते.

              होळी हा सर्व भारतभर साजरा केला जाणारा उत्सव असून उत्तर भारतात अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. ह्या उत्सवाला होलिकादहन, शिमगा, हुताशनी महोत्सव,दोलायात्रा’, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो किंवा शिमगा म्हणतात.

               भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. त्याबरोबर होलिका देवीचा वध श्रीविष्णू यांनी केला होता व होलीकाचे दहन केले होते अशी  आख्यायिका प्रसिद्ध आहे.

          महाराष्ट्रात होळीचा हा सण होळी, धुळवड व रंगपंचमी अशा प्रकारे साजरा करतात. होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ आहे. . होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो एकमेकांना रंग लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.

               भारतात उत्तर भागात, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, राजस्थान, गुजरात या भागात वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो.

 

                 होळीचा हा उत्सव आपल्याला अनेक गोष्टीची शिकवण देतो. होळीदहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळी आपल्याला शिकवते की अंधाऱ्या समयी टिकून राहायचे असते आणि सकाळच्या सूर्य किरणांची वाट पाहायची असते. रंगपंचमी चे रंग वसंत ऋतू मध्ये खुलणारे रंग दर्शवतात. आपल्याला या सुंदर सणा मागची शिकवण, संदेश समजून घ्यायला हवा.

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

Wednesday, 3 March 2021

Inspiring female form : प्रेरणादायी स्त्री रूप

 

प्रेरणादायी स्त्री रूप......

 

                   तू चंचला, खळखळत्या रूपातून संथ वाहत्या रुपात होणारी...... तू निरागस, सर्व काही आहे तसे न तक्रार करता स्वीकारणारी..... तू धाडसी, संकटावर मात करून इतिहास घडवणारी..... तू सुजला, जीवनात दोन्ही तीरांना जीवन देणारी.... तू दयाळू, सर्वांच्या सर्व चुका आपल्यात सामावून घेणारी..... तू संजीवनी, सर्वाना आपल्या असण्याने नवसंजीवनी देणारी..... तू अर्पिता, स्वतःच अस्तित्व विसरून इतरात स्वतःला पाहणारी..... तू देविका, घराघराला, मनामनाला एकसंघ बांधणारी..... तू त्यागी, दुसऱ्यासाठी आपले सुख बाजूला ठेवणारी.....  तू स्त्री, अखंड विश्वाची जननी..........

                  स्त्री आपल्या समाजाचा अविभाज्य भाग. प्राचीन काळापासून पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात स्त्रियांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. अडचणीच्या, संकटाच्या काळात याच स्त्रीरुपाने मानवी जातीचे रक्षण व संवर्धन केले आहे. पण तरीही मानणे व प्रत्येक्ष असणे यात फरक आहे. समाजातील व कुटुंबातील स्त्रियांचे स्थान व त्यांना घालण्यात आलेली बंधने आपल्याला ज्ञात आहेत.

                  काळ बदलला, काळाबरोबर स्त्री ही बदलली. चूल आणि मूल या भूमिकेबरोबर इतरही जबाबदाऱ्या ती सक्षमपणे पार पाडून तिने आपले समाजातील महत्व व अस्तित्व दोन्ही सिद्ध केले आहे. आज विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य, संगीत, अभिनय, राजकारण, अर्थकारण, अवकाश संशोधन, कुटुंब, समाज अशा सर्वच  ठिकाणी स्त्रियांची कामगिरी सरस आहे.

                राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यासारख्या कर्तबगार स्त्रियांनी राज्यकारभार व प्रशासन यातील स्त्रियांचे महत्व अधोरेखित केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या रूपाने ज्ञानाची कवाडे समस्त स्त्रीवर्गाला खुली करून ज्ञानाची अखंड ज्योत तेवत ठेवली आहे. मदर तेरेसांच्या रूपाने सेवा व वात्सल्य याचे दर्शन आपल्याला घडते. स्वर्गीय आवाजाची जादू गानसम्राज्ञनी लता मंगेशकरांच्या आवाजातून आपल्याला अनुभवायला मिळते. कल्पना चावला, सुनिता विल्यम यांनी स्वप्नाला मर्यादा नसतात हे सिद्ध केले आहे. याशिवाय इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज्य, किरण बेदी, सुधा मूर्ती, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कोम, हिमा दास, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, श्रेया घोषाल यासारख्या अनेक महिलांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने यशाचे झेंडे रोवून आपली व समाजाची मान उंचावली आहे.

               या सर्व कर्तबगार महिलांच्या कर्तुत्वाबरोबर  आपल्या आईचे, आजीचे, मावशीचे, बहिणीचे, पत्नीचे, मैत्रिणीचे, मुलगीचे कार्य तितकेच अजोड व महत्वपूर्ण आहे. किंबहुना आपल्या घरातील प्रत्येक स्त्री ही कर्तुत्वान व विशेष आहे. आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या सर्व जबाबदाऱ्या व कर्तव्याच्या ओझ्याखाली असूनही तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे व करत आहे.

              स्त्री ही अजिंक्य, अभेद्य, कनवाळू, पालनहारी, विरता, साहस, सुंदरता, धैर्य, रौर्द्र या नऊ गुणांनी संपन्न असते.  स्त्री बाबतची आदराची भूमिका ही दाखवण्याची गोष्ट नसून ती आत्मसाद करण्याची गोष्ट आहे. घरी, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांचा सन्मान व आदर होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांचा दृष्टीकोन बदलणे महत्वाचे आहे व हे ज्या वेळी शक्य होईल त्यावेळी स्त्रीला खरा न्याय व सन्मान मिळेल. त्यावेळी वर्षातील एक दिवसापुरता महिला दिन न राहता सर्व दिवस महिला दिन होतील.

              जन्मापासून आई, आजी, काकी, आत्या, मावशी, मामी, शिक्षिका, बहीण, मैत्रीण, प्रेमिका, बायको आणि मुलगी या प्रत्येक रुपात स्वतःच अस्तित्व बाजूला ठेऊन त्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारी- स्त्री.....

             महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या असण्याला व कर्तुत्वाला कोटी कोटी प्रणाम व खूप साऱ्या शुभेच्छा........

"हे नारी तू घे भरारी

व्यापून टाक क्षितिजे सारी"

 

 

संदीप कोळी....

Sandip.koli35@gmail.com

 

 


Women's Day : जागतिक महिला दिन

 

जागतिक महिला दिन 

उत्तुंग तुझ्या भरारी पुढे

गगन हे ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली

अवघे विश्व हे वसावे

                    ८ मार्च हा दिवस सर्व जगात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. विसाव्या शतकात अमेरिकेसह, युरोपातील अनेक देशात महिलांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. त्याचबरोबर महिलांच्या अनेक अधिकारावर नियंत्रण ठेवले जात होते. या अन्यायाविरुद्ध ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनेक स्त्री-कामगार व महिलांनी लढा दिला व आपला हक्क मिळवला.

                       स्त्रियांच्या हक्काच्या लढ्याच्या सन्मानार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने १९७५ हे वर्ष ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून साजरे केले होते. भारतात ८ मार्च हा महिला दिवस प्रथम मुंबईत १९४३ रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक वर्षी ८ मार्च हा दिवस आपल्या भारतातही ‘महिला दिवस’ म्हणून साजरा केला जातो. .

                 भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या सन्मानाला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून स्त्रियांना देवीचा, मातेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक सण-समारंभामध्ये  स्त्रियांचे महत्वाचे स्थान आहे. पण प्रत्येक्षात समाजात परिस्थिती वेगळी आहे. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान देण्यात आले आहे.

                स्त्रिया या समाजरचनेचा अविभाज्य अंग आहेत. मानवी समाजात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबर आहेत पण अनेक ठिकाणी स्त्रियांचा हा समानतेचा हक्क नाकारण्यात येतो. त्यावेळी स्त्रियांना आपल्या हक्कासाठी लढावे लागते. तिला आपली गरज व योग्यता दोन्ही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात.

                     काळाबरोबर स्त्रियांच्यामध्ये अनेक बदल झाले. प्राचीन काळापासून चूल आणि मूल इतक्यातच मर्यादित असणारी स्त्री आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर किंबहुना काही ठिकाणी पुरुषांच्या पुढे आहे. आज विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य, संगीत, अभिनय, राजकारण, अर्थकारण, अवकाश संशोधन, कुटुंब, समज अशा सर्वच  ठिकाणी स्त्रियांची कामगिरी सरस आहे.

                जगभरात अनेक स्त्रियांनी आपले  कर्तुत्व गाजवले आहे. यात आपल्या भारतीय स्त्रिया कमी नाहीत. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, कल्पना चावला, किरण बेदी, प्रतिभाताई पाटील, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कोम, हिमा दास, ऐश्वर्या राय यासारख्या अनेक भारतीय महिलांनी आपल्या कर्तुत्वाने यशाचे झेंडे रोवले आहेत.

              महिला दिनाच्या निमित्ताने देशात, राज्यात विविध ठिकाणी, कार्यालयात, शाळा व महाविद्यालयात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. कर्तुत्वान व यशस्वी महिलांचा गौरव केला जातो. अनेक संस्था स्त्रियांना विविध पुरस्काराने सन्मानित करतात. अनेक ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन केले जाते. महिलांना शुभेच्छा दिल्या जातत. 

                       स्त्री ही अजिंक्य, अभेद्य, कनवाळू, पालनहारी, विरता, साहस, सुंदरता, धैर्य, रौर्द्र या नऊ गुणांनी संपन्न असते.  स्त्री बाबतची आदराची भूमिका ही दाखवण्याची गोष्ट नसून ती आत्मसाद करण्याची गोष्ट आहे व हे ज्या वेळी शक्य होईल त्यादिवशी स्त्रीला खरा सन्मान मिळेल. त्यावेळी हा महिला दिन एक दिवस दाखवण्यापूरता न राहता तो 365 दिवस राहिल.

         जन्मापासून आई, आजी, काकी, आत्या, मावशी, मामी, शाळेतल्या बाई, बहीण, मैत्रीण, प्रेमिका, बायको आणि मुलगी या प्रत्येक रुपात स्वतःच अस्तित्व बाजूला ठेऊन त्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारी- स्त्री.....

"हे नारी तू घे भरारी

व्यापून टाक क्षितिजे सारी"

              आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या असण्याला व कर्तुत्वाला कोटी  प्रणाम....

धन्यवाद.....


संदीप कोळी....

Sandip.koli35@gmail.com

 

 

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...