Friday, 17 October 2025

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. आपल्या घरात लगबग सुरू झाली असेल. झाडलोट, पसारा आवरणे या गोष्टी ' शास्त्र असते ते' असे मानून आपली इच्छा असो अथवा नसो तरी निष्ठेने सुरू असते. जुने काढून नव्याला नवीन जागा केली जात आहे. आवश्यक गोष्टीची दुरुस्ती करून अनावश्यक गोष्टीला हळुवारपणे घराच्या बाहेरचा रस्ता दाखवल्या जात आहे. नवीन गोष्टीसाठी आवश्यक जागा मोकळी केली जात आहे. 
               हे सर्व झाल्यावर किती छान वाटत हो ना? अगदी मोकळं मोकळं आणि नव्याच्या उत्सुकतेची वाट पाहणारी रिकामी जागा.
          ही सर्व साफसफाई झाल्यावर घर किती छान व नीटनेटक वाटतो हो ना? अनावश्यक गोष्टी बाहेर गेल्याने नव्या गोष्टींसाठी खूप जागा रिकामी झाल्याने घराचे रूप अजून खुलून येत. पण हे झालं घराचं पण आपल्या मनाचं काय?
            या सणाच्या निमित्ताने आपले मन ही आवरायला घेऊया...
            वाचून थोडे गोंधळात पडलात? घराच्या साफ-सफाईला आपण जेवढे महत्त्व देतो तितका वेळ आपण आपल्या मनासाठी काढत नाही. 
            या सणाच्यानिमित्ताने आपण ही आपल्या मनाचे कोपरे आवरायला घेऊया. माणसांच्या मेळात आणि विचाराच्या घोळात दररोज वावरत असताना आपल्या मनाचे अनेक कोपरे अनेक गोष्टींनी भरून गेलेले असतात. त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आणि आयुष्यभरासाठी जपण्यासारख्या असतात.  त्याचे महत्त्व अमूल्य असते. त्यांना पुन्हा उजाळा देऊन मनाच्या खास कोपऱ्यात पुन्हा दिमाखाने ठेवायच्या असतात.
            पण या मनाच्या घरात अशा अनेक अनावश्यक व आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी खोल कुठेतरी रुतून बसलेले असतात. त्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर ते आपल्या दुःखाचे कारण बनतात. "साचून राहिले की कुजते" या निसर्गाच्या नियमाने अनावश्यक गोष्टी खूप दिवस मनात साठवून राहिल्या की त्या त्रासाशिवाय आपल्याला काही देऊ शकत नाही. याप्रसंगी आपण आपल्या मनातील अशा गोष्टी बाहेर काढूया. वाईट विचार बाजूला ठेवूया. ज्या व्यक्तींनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांना माफ करून त्यांचा विचार सोडून देऊया. ज्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा त्यांचा त्रास होतो त्या गोष्टी let go करूया. अनावश्यक गोष्टींची जागा रिकामी करूया. ज्यांच्याशी भांडण झाले, ज्यांच्याशी वाद झाले, मतभेद झाले अशा गोष्टी खूप वेळ मनात ठेवण्यापेक्षा तर सोडून दिलेल्या कधी चांगल्या. त्रास देणारी प्रत्येक गोष्ट व्यक्ती, परिस्थिती व ठिकाण आपण सोडून द्यायला शिकले पाहिजे. 
                 चांगल्या आठवणी, चांगले लोक, चांगले संवाद यांना पुन्हा उजाळा देऊन ती जपून ठेवूया. चांगली नाती, चांगले विचार, चांगले लोक यांना अडगळीत जाऊ न देता त्यांना महत्त्व देऊया. त्यांच्याशी संवाद साधूया. चांगल्या व आपल्या व्यक्तींशी वेळ काढून संवाद वाढवूया. 
                 टाचणी कितीही हलकी व छोटी असली तरी आपण ती फार वेळ हातात धरू शकत नाही. त्याप्रमाणे त्रास देणारी गोष्ट किती लहान असली तरी ती फार काळ मनात राहिली तर त्याची आडगळ होते. या मनाच्या आवारावरीत या गोष्टी बाहेर काढून नवीन क्षण, नाती, विचार व व्यक्ती यासाठी जागा करूया.
               या सणाच्या निमित्ताने घराबरोबर मन ही आवरायला घेऊन दुःखाची, त्रासाची, वेदनेची, अपराधीपणाची जळमटे अडगळीच्या कोपऱ्यातून बाहेर काढून चांगल्या क्षणांची, विचारांची, व्यक्तींची जागा सक्षम करून नवीन गोष्टीसाठी मनाची कवाडे पुन्हा एकदा उघडू या.
धन्यवाद!!!!!


© संदिप कोळी 
9730410154
sandip.koli35@gmail.com

Monday, 26 May 2025

संवेदनशील मन

संवेदनशील मन
            आपल्या जेवणात नाना प्रकारचे अन्नपदार्थ येतात. वरण, भात, पोळी, कोशिंबीर, भाजी यांनी सजलेले ताट हे आपल्याला सौभाग्य सूचक वाटते. या ताटातील सर्व पदार्थ पोटात एक होतात, पण ताटात त्यांची स्वतंत्रता सांभाळली जाते. त्यावर घडणारी पाकक्रिया वेगवेगळी असते. शिजण्यापासून पचण्यापर्यंत प्रत्येक पदार्थाला लागणारा कालावधी एकसारखा नसतो.
              माणसाच्या मनाचे ही असेच आहे. विचार, विकार, संकल्प, बुद्धी, भावना, प्रेरणा अशा विविध रूपाने ती प्रकट होते. मनाचे बदलते रूपे संदर्भ सापेक्ष असतात. कोणत्या वेळी कोणी पुढे यावे याचा विवेक मनाच्या ठायी असतो. मेंदूच्या रूपाने मानवाला प्रचंड बुद्धिमत्ता मिळाली, त्याचप्रमाणे मनाच्या रूपाने मानवाला प्रचंड कल्पनाविश्वही मिळाले आहे. अस्तित्वात असणाऱ्या किंवा आपण मानणाऱ्या गोष्टीतील सर्वात चंचल व सर्वात स्थिर म्हणजे आपले मन. सतत कल्पनाविश्वात व स्वप्न रंजनात रमणारे मन ही माणसाची खूप मोठी सुप्त शक्ती आहे.
                विज्ञानाच्या संकल्पनेत आपण 'मन' सिद्ध करू शकत नाही, किंबहुना आपल्या शरीरात मन नावाचा अवयव नाही, पण तरीही मानसशास्त्रात मनाचे सामर्थ्य ठळकपणे अधोरेखित केले आहे. मानवाच्या ठाई असणारी शक्ती ही मनाच्या माध्यमातून एकवटते व त्याचे चांगले अथवा वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम आपल्याला दिसतात.
         संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला सांगतो की, 
मनात करा रे प्रसन्न।। सर्व सिद्धीचे कारण ।।
मोक्ष अथवा बंधन।। सुख समाधान इच्छा ते।।१।।
        म्हणजेच आपली शक्ती मनात असते. कोणतीही घटना घडल्यावर त्यावर आपले मन व्यक्त होते. कधी रडू येते, कधी राग येतो, कधी वाईट वाटते, कधी आनंद होतो, कधी हेवा वाटतो, कधी अभिमान तर कधी प्रेम या सर्व माध्यमातून आपण व्यक्त होतो.
          संवेदनशीलता पण मनाचीच बाजू. एखाद्या प्रसंगात आपण कसे व्यक्त होतो आणि त्यावर काय प्रतिक्रिया देतो याला सोप्या भाषेत संवेदनशीलतेकडे वळवता येईल. आपल्यासोबत किंवा सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत रिऍक्ट होण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ: रस्त्यावर बसलेल्या कुत्र्याला दगड मारल्यावर तो वेदनेने ओरडत असेल तर काहीजण हसतील, काही जणांना गंमत वाटेल, काही जणांना वाईट वाटेल, तर काहीजणांना दया येईल हे वाटणे... हा प्रत्येकाच्या मनातील संवेदनशीलतेचा भाग असतो.
           आपल्याकडे संवेदनशील माणसाला 'इमोशनल' असे गोड नाव दिले जाते व संवेदनशीलता हा त्या माणसाचा weak Point आहे असे भासवले जाते, पण तसे मुळीच नाही आहे. संवेदनशील मन ही खूप मोठी ताकद आहे. मानवी भावना जाणून त्या हळुवार हाताळण्याची ती देणगी आहे. आपण जर खरंच संवेदनशील असू तर तो आपला weak Point नसून Strong plus point आहे. मानसिक दृष्ट्या आपण हळवे असलो तरी आयुष्याची ती मोठी पुंजी आहे. कारण जगात एकटी पडणारी माणसे ही भावनाशून्य आणि असंवेदनशीलच असतात.
             संवेदनशील मनामुळे बऱ्याच वेळेला चिडचिड होते, रडू येत, सगळेच आपल्या विरोधात आहे असे वाटते. सगळे संपले असे वाटते, पण हा आपला चांगुलपणा असतो. सगळे चांगले व्हावे असे वाटणे, आपल्याला किती त्रास झाला तरी समोरच्याबद्दल आपण चांगलाच विचार करतो, कोणी कितीही त्रास दिला तरी आपण चांगल्याच बाजूने विचार करतो हीच आपली ताकद असते.
            ' जशास तसे' या सूत्राने आपण वागत नाही आणि नात्यात व आपल्या जवळच्याशी वागू ही नये. नाहीतर नाती कुमकत होतात. हळू-हळू आपण या मनाच्या चांगुलपणाचा प्रभावी वापर करायला नक्कीच शिकू...
            शेवटी जग हा बाजार आहे. त्यात व्यवहारा वर चालणारी बरीच नाती असतात. त्यामुळे संवेदनशील मनाच्या माणसाची जास्त फसवणूक होत.
         किसी ने क्या खूब कहा है, "जो लोग दिल के अच्छे होते हैं।
 दिमाग वाले अक्सर उनका जमकर फायदा उठाते हैं। 
             पण याचा तोटा चांगल्या मनाच्या माणसाला होत नाही, मात्र संवेदनशील मनाच्या माणसाला फसवल्याचे शल्य फसवणाऱ्याच्या मनात वाढते. संवेदनशीलता ही मनाची प्रचंड शक्ती आहे आणि "अक्सर किस्मत वालो को ही नसीब होती है।"

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com

Saturday, 24 May 2025

भावनाशून्यतेच्या जगात Emotionless World

🌸भावनाशून्यतेच्या जगात..

आकाशगंगेच्या मनात आले नि ग्रहांच्या फिरण्याबरोबर त्यांना नवनिर्मितीचा नाद लागला. मंदाकिनीमधील आठ ग्रहांपैकी पृथ्वीने जगाच्या कल्याणाचे फारच मनावर घेतलं व स्वतःला सजीवांचे निर्मितीसाठी सज्ज केले. वातावरणातील अनेक बदलाचे प्रयोग करून शेवटी पृथ्वीने पाण्यात आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आणि पृथ्वीच्या लेकरांचा गोतावळा वाढत गेला. पृथ्वीवरील सजीवांचा गोतावळा लाखोच्या घरात गेला व या सर्वांना पृथ्वीने मायेने सांभाळले आहे. 
            आपली म्हणजे पृथ्वीच्या सर्वात हुशार लेकराची निर्मिती साधारण 2 ते 5 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली. आपण पृथ्वीवर आलो तेच सर्वांच्यापेक्षा वेगळे आणि त्यात निसर्गाने आपल्यावर इतकी कृपादृष्टी दाखवली की आपण इतर सजीवांच्या तुलनेत बौद्धिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या खूप संपन्न झालो.
            डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांत : नैसर्गिक निवड (Survival of the fittest) हा इतर प्राण्याप्रमाणे आपल्याला लागू होतो. जो सक्षम असेल तो जगण्यास पात्र आहे असे सांगणारा हा नियम जरी असला तरी इतर सजीव व आपल्यामध्ये या नियमाचे अनेक वेगळे पैलू आहेत.
               भावनिकतेच्या जगात इतर सजीवांच्यापेक्षा अतिउच्च टोकावर असणारे आपण इतर प्राण्याप्रमाणे भावनाशून्य अजिबात नाही. सामाजिक आणि भावनिक पातळीवरील जडणघडण आपल्याला इतर प्राण्यांच्यापेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण करत आहे, पण काळाच्या ओघात आपल्यात ही खूप बदल झाले आहेत. माकडापासून माणूस झाल्यानंतर सुरु झालेल्या प्रगतीचा आलेख प्रचंड वेगाने वरती जात आहे. या आलेखानुसार बौद्धिक व सामाजिक स्तरावर आपण डोळे दीपवणारी प्रगती केली आहे, पण भावनिक स्तरावर झालेली अधोगती डोळे शरमेने झुकवणारी ठरत आहे.
             प्रगतीच्या नावाखाली भावनिकतेची होणारी हेळसांड मानव म्हणून आपल्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरू लागली आहे. पूर्वी आपण वस्तू वापरत होतो व माणसांवर प्रेम करून भावना जोडत होतो, पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीत यंत्रामध्ये भावना फुंकता- फुंकता आपल्या माणसातील भावनिकता, माणुसकी कुठे उडून गेली हे आपल्या लक्षातही आले नाही. त्यामुळे आपण सध्या माणसे वापरतोय आणि वस्तूवर प्रेम करू लागलो आहोत.
             प्रगती, प्रतिष्ठा, आत्मनिष्ठ, स्वअभिमान याच्या नावाखाली आपण किती मोठ्या प्रमाणावर भावनिक अध: पतनाकडे निघालो आहे याची जाणीव आपल्याला होत नाही आहे. समाजात सुरू असलेले द्वेष, धर्मात सुरू असलेले कलह, देशांच्यामध्ये सुरू असलेले वाद- विवाद, खोट्या प्रतिष्ठासाठी होणारे गुन्हे, अमानुष छळांचे होणारे समर्थन आणि उदात्तीकरण हे कोणत्या प्रगतीची लक्षणे आहे याचा आपण बारकाईने ठाव घ्यायला हवा.
              सध्या आपल्याकडे बौद्धिक क्षमतेची अजिबात कमतरता नाही, पण माणूस म्हणून आवश्यक असणारी भावनिक क्षमता व सामाजिक क्षमता आपण तपासायला हवी. आधुनिकीकरणात तंत्रज्ञानाच्या अतिउच्च प्रगतीत आपण सजीव म्हणून किंवा माणूस म्हणून असणारी मूलभूत भावनिक कौशल्य विसरायला लावणाऱ्या अनेक घटना दररोज मनाला हेलावून टाकत असतात. त्या घटना वाचत असताना किंवा ऐकताना खरच हे माणसाचे कृत्य आहे का? याचा प्रश्न पडतो.
             प्राणी ही गरज नसताना व आवश्यकतेपेक्षा जास्त शिकार करत नाही, पण आपण माणूस नावाचा प्राणी आपल्या भावनिक विकलांगतेचे दर्शन दाखवून अमानुष अत्याचाराचे उदात्तीकरण सध्या करत आहोत.  हा तोच माणूस आहे का, की ज्याच्या समोर हृदयद्रावक प्रसंगाचे वर्णन जरी केले तरी डोळ्याच्या कडा नकळत पाणवतात हा प्रश्न सध्या उभा राहत आहे.
             तंत्रज्ञानाच्या विकासावर मानवाच्या प्रगतीचा आलेख मोजत असताना समाजातील भावनाशून्यता दाखवणाऱ्या घटना आपल्या भावनिक अधोगतीचे लक्षण आहे. माणूस म्हणून या पृथ्वीचे लाडके अपत्य म्हणून आपल्याला कौतुकाने मिरवायचे असेल तर भावनिकता व सामाजिकतेच्या कसोटीवर खरे उतरून माणुसकीचा आलेख उंचवावा लागेल.

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com 

Digital Disconnect (डिजिटल डिस्कनेक्ट)

🌸 Digital Disconnect (डिजिटल डिस्कनेक्ट)
               परवा अशीच एक मजेशीर, पण विचार करायला लावणारी घटना घडली. सहज एका जवळच्या व्यक्तीने फोन केला आणि विचारले अरे नेट का बंद आहे तुझे???
                 प्रश्न सोपा, सरळ व साधा होता, पण मला ही काहीतरी मोठी चूक झाली असे वाटले, की अरे मोबाईल चे नेट बंद कसे काय ठेवले मी???
               गंमतीचा विषय बाजूला ठेवला तर हा प्रश्न साधा ही नाही, सरळ ही नाही आणि सोपा तर अजिबात नाही, कारण तो आपल्या दैनंदिन जीवनातील यक्ष प्रश्न म्हणून उभा ठाकला आहे. 
          बारकाईने आपणच मोबाईल नावाच्या आरशात आपल्या स्वतःला पाहिले तर त्या मोबाईलच्या प्रेमात आपण नखशिखांत बुडालेलो आहोत याची लख्ख जाणीव मोबाईलच आपल्याला करून देतो. पूर्वी मोबाईल आपल्या सोबत असत होता, पण आता आपण मोबाईल सोबत आहोत. पूर्वी आपल्याला हवे ते मोबाईलवर आपण पाहायचो, पण आता मोबाईलचा algorithm आपल्याला त्याच्यानुसार किंबहुना आपल्या मूडनुसार काय पाहिजे ते दाखवतो. खरेदी करायच्या विषयात पण आपल्याला पाहिजे असणारी गोष्ट मोबाईल मात्र त्याच्या आवडीने आपल्याला खरेदी करायला लावते. 
                या सर्व गोष्टी आता आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्यातील कितीही तोटे व धोके परिचित असले तरी आपल्याला ते धोके पचवून, तोटे सहन करत 'खतरो के खिलाडी' होण्याचा चंग आपण बांधलेला आहे. 
              हे सर्व जरी खरे असले तरी आपण थोडे शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या फोनचे इंटरनेट आता दिवसभर व काही जणांचे तर 24 तास सुरू असते. पूर्वी आपण गरजेनुसार इंटरनेट वापरत होतो. आता इंटरनेट आपला गरजेप्रमाणे वापर करत आहे. महिन्याभराचा डेटा पॅक आपण आवश्यकतेनुसार सांभाळून खर्च करत होतो, पण डिजिटल क्रांती झाली आणि 1.5 GB आणि अनलिमिटेड डेटा च्या मोहपाशात आपण अडकलो. आता कितीही व कसे इंटरनेट वापरले तर ते संपतच नाही या धारणेवर आपण इंटरनेट बंदच्या बटनाकडे फिरकायचे बंद केले आहे. 
                 काही वर्षांपूर्वी whatsapp ला एखादा महत्त्वाचा मेसेज जरी पाठवला तरी ती व्यक्ती ऑनलाईन येण्याची वाट पाहत बसावी लागे किंवा त्याला फोन करून मेसेज बघ म्हणून सांगावे लागे, पण आता मेसेज पडला की लगेच डबल टिक येते म्हणजे मेसेज पोहोचला व आपण निश्चित झालो. आता हे सर्व इतक्या अगवळणी पडले आहे की मोबाईलचे इंटरनेट काही काळ जरी बंद केले तर आपण काहीतरी महत्त्वाचे गमावत आहोत याची टोचणी मनाला लागते. 
                 इंटरनेट व मोबाईलच्या तालावर नाचताना खरंच थोडी विश्रांती आपल्याला हवीच की आणि त्यासाठी दिवसभरात काही काळ इंटरनेट बंद ठेवून हा डिजिटल power nap घ्यायला काय हरकत आहे? नाहीतर हे फार वेळ आपल्याला ठेवता येणार नाही. कारण मोबाईल आपल्याला त्याच्या अदानी प्रेमाच्या जाळ्यात खेचायला तयारच आहे. 
             थोड्या वेळासाठी का असेना पण डिजिटल डिस्कनेक्ट व्हायला हरकत काय आहे? आपण दिवसभर जगाच्या अंगणात दरवळत असतो. डिजिटल डिस्कनेक्ट होऊन काही क्षण स्वतःच्या अंतर्मनात स्वतःला वेळ देण्याची बातच काही और आहे. म्हणूनच म्हणतो 'करके देखो अच्छा लगता है।' 
धन्यवाद!!!

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com

नात्याची घट्ट गाठ (Relationship Bond)

नात्याची घट्ट गाठ 
           दोन सामान्य शेतकरी. सख्खे शेजारी. आपल्या कामात प्रचंड प्रामाणिक उत्साही. दोघे एक दिवस ठरवतात की आपण आपल्या परसबागेत एकाच जातीचे फळाचे रोप लावूया. ठरलेल्या गोष्टीवर अंमल करण्यासाठी दोघांनी नामवंत रोपवाटिकेतून जातिवंत रोपाची निवड करून आपापल्या परसबागेत योग्य पद्धतीने त्याची लागण केली. दोन्ही रोपांचा फुलण्याचा प्रवास सुरू झाला.
           निसर्ग नियमाने दोन्ही रोपे मोठी होऊ लागली. पहिला शेतकरी दररोज त्या रोपाला वेळ द्यायचा. त्याच्या प्रत्येक गोष्टीचे बारकाई निरीक्षण करून त्याची दखल घेत होता. प्रत्येक वेळी अनावश्यक गोष्टी बाजूला काढणे. एखादी फांदी जरी वाकडी आली असेल तर ती काढून टाकत असे. रोग पडू नये म्हणून आधीच त्यावर सर्व प्रकारचे औषध फवारणी. भुंगे, किडे, फुलपाखरू यांचा त्रास होऊ नये म्हणून त्या भोवती बारीकशी जाळी त्याने लावली. एकंदरच शक्य तितके त्यांनी त्या झाडाची काळजी घेऊन त्याला हवे तसेच त्या रोपाचे झाड त्यांने घडवले.
             याउलट दुसरा शेतकरी रोपांची काळजी घेत होता. त्याला पाणी, खत आवश्यकतेनुसार पुरवत होता. रोग आल्यावर आवश्यक तेच औषध फवारणी करत होता. त्याचेही झाड मोठे झाले.
            शेवटी तो हंगाम आलाच. ज्यासाठी या दोघांनी अट्टाहास केला होता. दोघांचीही झाडे मोहराली . दोघेही आनंदी झाले, पण प्रत्यक्ष फळ लागले व त्याचा दर्जा पाहिला तर पहिल्या शेतकऱ्याच्या झाडाला मोजकीच व अत्यंत सामान्य  दर्जाची फळे लागली. उलट दुसऱ्या शेतकऱ्याचे झाड फळांनी वाकले होते व फळांचा दर्जा अपेक्षित दर्जापेक्षा चांगला होता. 
            गोष्ट फळांच्या झाडाची असली तरी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नात्यांची वीण घट्ट करत असताना आपल्याकडून नकळत त्या पहिल्या शेतकऱ्यांसारखे तर होत नाही ना? हे तपासायला हवे. कोणतेही नाते टिकते ते काळजी, विश्वास आणि स्वातंत्र्य यावर आणि ती फुलण्याची शक्यता या तीन गोष्टींच्या तीव्रतेवर अवलंबून असते. कोणती गोष्ट कितीही चांगली असली तरी ती अधिक प्रमाणात झाली तर तिची परिणामकारकता कमी होते किंवा त्याचा परिणाम उलटा व्हायला लागतो.
               कोणतेही नाते असो त्यामध्ये काळजी, विश्वास व स्वातंत्र्य हे प्रमाणात असेल तर ते फुलते, नाहीतर अतिकाळजी किंवा दुर्लक्ष, अतिविश्वास किंवा अविश्वास, स्वातंत्र्य किंवा शिस्तीच्या नावाखाली लावलेली निर्बंध यामुळे नाते कदाचित सोबत राहील पण ते फुलेलच असे नाही. आणि ही गोष्ट दोन्ही बाजूंकडून होणे गरजेचे आहे. नात्यात प्रयत्नांची तीव्रता कमी जास्त झाली तरी दोन्हीकडून मिळून 100% प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यातला आपलेपण निघून मिरवण्यापूर्ती औपचारिकतेची कोरडी झालर शिल्लक राहते. 
             पहिल्या शेतकऱ्यांने नाते जपले, पण ते अतिकाळजी, अविश्वास व शिस्तीच्या नावाखाली निर्बंध लावले.  दुसऱ्या शेतकऱ्याने जपलेले नाते काळजी, विश्वास व स्वातंत्र्य या तिन्ही बाबीवरून तोल सांभाळून होते. म्हणून त्याला त्यात अपेक्षेपेक्षा भरपूर मिळाले. उलट पहिल्या शेतकऱ्याला अपेक्षित गोष्टीही मिळाल्या नाहीत.
         शेवटी नाते कोणतीही असो ते जिवंत घटकांशी संबंधित असते आणि ते टिकवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व दोघांचा समजूतदारपणा गरजेचं असतो. शेवटी टिकवणाऱ्याकडे हजार कारणे असतात नाते टिकवण्याची व न टिकवण्यासाठी एकच पुरेसे असते निघून जाण्यासाठी...

🖊️ संदिप...
sandip.koli35@gmail.com

Tuesday, 31 December 2024

आज : Today

📝 आज.......
      आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे मानतात तर काही जण आणखी एक नवीन वर्ष, नवी संधी आली असे मानतात. खरी गंमत वेगळीच असते काही गेलं ,काही येणार आहे म्हणण्यापेक्षा आहे ते Enjoy करणारा खरा शहाणा ठरतो. 
          अर्धा ग्लास बघून अर्धा ग्लास रिकामा कि अर्धा ग्लास भरलेला हे ठरवण्यापेक्षा तो ग्लास पिऊन टाकणारा शहाणा ठरतो. तेच आपल्या आयुष्याच्या बाबतीत ठरते कारण भुतकाळ आपल्याला *निराश* करतो तर भविष्यकाळ काळजी करायला लावतो. पण फक्त आज आणि फक्त आजच आपल्याला जगायला, आनंदी राहायला , आनंदी राहायला शिकवतो. भुतकाळ आणि भविष्यकाळ विसरायला लावणारा तो 'आजचा' क्षण असतो. आणि तो 'आजचा' क्षण आपण 'आजच' जगला पाहिजे. 
          आपण नेहमी ठरवतो, हे करायचे, इकडे जायचे, त्याला भेटायचे, त्याला फोन करायचा, इकडे फिरायला जायचे, हा छंद जोपासायचा. पण हे सर्व प्रत्येक्ष करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपण या सर्वांकडे सोयीस्कर कारणासह अपेक्षित दुर्लक्ष करतो. आणि या सर्वांना योग्य Label  लावून बाजूला करतो. कधी सुट्टी नाही, कधी काम जास्त आहे, आत्ता नको नंतर बघू ,असे म्हणून आपण आपल्याच Emotion चा गळा दाबतो. आणि मग आजच्या सारख्या एखाद्या दिवशी एकटे बसून आठवणी काढून निराश होतो.
         "So कल को मारो गोली, आज अभी आणि आत्ता " जे करायचे ते आत्ता करू, कुणाला भेटायचे आहे ना आत्ता भेटू , कोणाला फोन करायचा ना आत्ता करू, फिरायला जायचे ना आज निघू. थोडक्यात आपले Emotion control करण्यापेक्षा Express करायला आणि आजच करायला शिकले पाहिजे नाहीतर उद्या तो भुतकाळ होईल आणि आपल्या निराशेचे कारण होईल.
               "छोडो कल कि बाते,
                कल कि बात पुराणी।
                छोडो कल कि बाते
                कल कि बात है आनी।
                नए आज में लिखेंगे,
                 हम नई कहाणी।"
           आजच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा थोडासा Thoughtful विचार आज सुचला म्हणून आजच......

आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा💐💐💐
🖋 संदीप.....
sandip.koli35@gmail.com

Sunday, 30 June 2024

Leave while you are at the top of the game

🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏

29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर्षापासून असलेल्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ रोहित आणि टीमने संपवला आणि पूर्ण देशातच एक जल्लोष सुरू झाला. खरेतर सातत्याने इतकं छान क्रिकेट खेळत असताना " हाथ आया लेकिन मुंह ना लगा।" अशी अवस्था भारताची होत होती. गेल्या वर्षभरात भारत तीन वेळा आयसीसी ट्रॉफीच्या फायनल पर्यंत पोहोचला पण यशाला गवसणी घालण्यापासून काही क्षणांनी मात दिली होती, पण आज तो सुवर्णक्षण अवतरला आणि भारतीय टीमने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 
           भारतीय टीम ही सातत्याने अतिशय उत्तम कामगिरी करून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती त्यामुळे आजचा सामना हा भारतीयांसाठी प्रचंड महत्त्वाचा होता. एकीकडे भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्याचा अभिमान आणि कौतुक होत असताना दुसरीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी T20 मधून घेतलेली निवृत्ती ही सुद्धा मनाला कुठेतरी बोचणी लावून जाणारी आहे. भारतीयांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू. 
        पण का??? दोघेही इतका चांगला खेळ खेळत असताना अचानक अशा निवृत्तीची गरज होती का??? त्यांनी अजून काही वेळ वाट बघायला पाहिजे होती का??? 
         नाही.... त्यांनी घेतलेला हा निर्णय माझ्यामते सर्वोत्तम आहे. तुम्ही अशा वेळेला निवृत्ती घेत आहात की ज्या वेळेला तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर असाल तर निवृत्ती तुमच्यासाठी खूप फलदायी ठरत असते. रोहित व विराट सध्या या प्रकारात सर्वोच्च स्थानावर आहेत. अजून काही काळ ते खेळत राहतील. अतिशय उत्तम ही खेळतील यात शंका नाही, पण आज जो क्षण त्यांच्या आयुष्यात आला आहे तो पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही आणि अशा वेळेला सर्वोच्च शिखरावर असताना त्यातून बाजूला होणं ही खूप मोठी उपलब्धि दोघांनी साधली आहे. 
          या निर्णयामुळे ज्या- ज्या वेळेला t20 फॉरमॅटचा उल्लेख होईल त्यावेळी या दोघांची नावे तितक्याच अभिमानाने घेतली जातील. त्यांचा हा निर्णय सर्व क्षेत्राला लागू पडतो. तुम्ही ज्या वेळेला यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतात त्यावेळेला तिथून बाजूला जाणे हेच तुमचे खरोखरच यश असचे. Leave it when you are at peak. 
          रोहित आणि विराट या पुढेही भारतीय क्रिकेटसाठी कसोटी आणि वनडे च्या माध्यमातून योगदान देत राहतील यात शंका नाही. त्यांच्याकडे अजून खूप खेळ बाकी आहे याबद्दल खात्री आहे. दोघांनाही कसोटी व वनडे फॉरमॅटसाठी खूप खूप शुभेच्छा आणि t20 साठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद.....
        भारतीय संघ आणि रोहित टीमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन..

✒️ संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com

Thursday, 13 June 2024

जरा विसावू या वळणावर......

जरा विसावू या वळणावर......

 

                         दररोज आपल्याला जाग येते ती मोबाईलच्या गजरने... डोळे चोळत उठता उठता कधी मोबाईलचा डेटा On होतो कळत ही नाही. मग रात्री 11-12 ला बंद झालेली नोटिफिकेशनची टिक- टिक पुन्हा भरभर वाजू लागते. सगळी शोधा शोध झाल्यावर लक्षात येते की रात्रीत फारसं नवीन काही झालेलच नाही. मग थोडेसे हायसे वाटते. कोणाचा वाढदिवस? कोणाला शुभेच्छा? कोणाचे अभिनंदनाचे स्टेटस ठेवल्यावर आपल्याला प्रवाहात आहे याचे कौतुक वाटते आणि दिवसाचा प्रवास सुरू होतो.

                   सकाळचे आपले आवरून 15 - 20 मिनिटांपूर्वी ठेवलेला फोन पुन्हा हाती येतो व आपण जगाशी जोडले जातो. स्टेटस, मेसेज आणि नोटिफिकेशनच्या माध्यमातून मित्र, परिवार आणि दुनिया आपल्या डोळ्यासमोर दिसते. दिवसभर काम, प्रवास, भेटी, कार्यक्रम या ना अशा अनेक कामात आपण सतत व्यस्त असतो.

                 कोणाची भेट झाली की... काय? काय? च्यापुढे आपला संवाद जात नाही. आपल्याला गडबड असते. नंतर भेटतो. जरा गडबड आहे. अशा सबबी सांगून आपण काढता पाय घेतो.  समोर असणाऱ्या किंवा आपल्याला भेटावेसे वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्याला वेळ देता येत नाही.

            जगण्याच्या प्रवासात आपण इतके व्यस्त झालोय की समोर आहे त्याकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करून आपण पुढे जातोय. एक आयुष्य आहे व आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत हे 100% मान्य, पण हे So Called सगळे मिळवण्यात आपली स्वतःची ओढाताण तर होते, पण ज्याच्यासाठी आपण धावतोय ते सर्व आपल्याला सापडतही नाही आणि सापडलेच तरी आपले समाधान होत नाही. 

               जगण्याच्या धावपळीत कुठेतरी थोडं थांबून, थोडा विसावा हा तितकाच गरजेच आहे. जगाचे चक्र हे कायम सुरूच असणार आहे. कितीही जोरात धावलो तरी सर्वच ठिकाणी असणे व मिळणे कठीणच. फक्त या धावपळीत आपली फरपट होऊ नये इतकेच महत्त्वाचे. 

                पुढे जाणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय असले तरी आपल्या सोबतच्यांना पुढे घेऊन जाणे किंवा आपल्याबरोबर असणाऱ्यांसाठी वेळ देणं ही तितकच महत्त्व आहे. नंतर फोन करतो. नंतर भेटूया. नंतर बघूया. 

                सध्या गडबडीत आहे, वेळ नाही ही कारणे बाजूला ठेऊया. जगण्याच्या या शर्यतीत नंतर कुणालाच वेळ मिळत नाही व ती वेळ गेल्यावर अपराधीपणाची भावना कायम आपल्या सोबत राहते म्हणून नंतरपेक्षा आत्ता बोलूया, आत्ता भेटूया, आत्ता बघूया हे महत्त्वाचे आहे.

            गीतकार सुधीर मोघेंच्या गीताच्या सुंदर ओळी मला खूप आवडतात...

    'भले बुरे जे घडून गेले'

    'विसरून जाऊ सारे क्षणभर'

    'जरा विसावू या वळणावर....

    'जरा विसावू या वळणावर....

 

                      जगण्याच्या प्रवासात कुठेतरी थोडासा स्वल्पविराम घेऊन थोडसं थांबून स्वतःसाठी व जवळच्यांसाठी विसावा घ्यायला  नक्कीच हरकत नाही.

 

संदीप कोळी

sandip.koli35@gmail.com



 

Sunday, 23 April 2023

थांबा : सिग्नल सायकलसाठीही लागू असतो.

थांबा : सिग्नल सायकलसाठीही लागू असतो.

               कोणत्याही गोष्टीची नवलाई ही चार दिवस असते. त्यानंतर ती गोष्ट सवयीची व नंतर ती अंगवळणी पडते. त्याचप्रमाणे इचलकरंजी शहरातील सिग्नलचे नव्याचे नऊ दिवस संपून आता ते सर्व सिग्नल आपल्या सवयीचे झाले आहेत पण अजूनही ते अंगवळणी पडले नाहीत.
             सिग्नल ही वाहतुकीच्या नियंत्रणासाठी व शिस्तीसाठी आवश्यक गोष्ट आणि इचलकरंजीसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी तर ती अत्यावश्यकच.  त्यानुसार काही महिन्यापासून इचलकरंजीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही व्यवस्था नियमित कार्यान्वित आहे.  ही व्यवस्था वाहनधारकांच्या सवयीची झाली आहे, पण यात सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजेच सिग्नल सायकलसाठी असतो हे बाकी सायकलधारकांना पटतच नाही. यात लहानांपासून- थोरांचा समावेश आहे.
           इचलकरंजीत सायकल नियमित वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यामध्ये कामगार, विद्यार्थी  हे संख्येने जास्त आहेत, पण सिग्नलला आपल्या लक्षात येते की सायकल वापरणारे कोणत्याही वयातले असले तरी सिग्नलला मात्र कोणीच थांबत नाही. सिग्नल हा सायकलसाठी नसतोच असा एक गोड गैरसमज आपण सोबत घेऊन जगत आहोत. शिवाय सायकलला सिग्नल मोडल्याचा काही दंड पण होऊ शकत नाही. याचा परिणाम वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतोच, पण सिग्नल संपल्यानंतर प्रत्येक जण वेगाने जात असतो आणि त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले तर दोष कोणाला देणार????
             बाकी सिग्नलच्या एका डाव्या बाजूने जाऊन दुसऱ्या डाव्या बाजूला हळूच निघून जाणे यात वेगळी हुशारी दाखवणाऱ्याची, इतर कारणांनी सिग्नल मोडणाऱ्यांची व वाहतुकीचे नियम विसरणाऱ्याची संख्या कमी नाही.
              ते काही असले तरी नियम हे आपल्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी आहेत आणि ते पाळायला हवेत. सायकल ही एक वाहन आहे व रेड सिग्नलला सायकलही थांबणे हे सुरक्षिततेसाठी व अपघात टाळण्यासाठी गरजेचे आहे. शेवटी कोणत्याही कामापेक्षा आपण स्वतः खूप मौल्यवान आहोत.


🖋️ संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com


Wednesday, 11 January 2023

प्रेरणादायी जिजाऊ चरित्र

🌈 प्रेरणादायी जिजाऊ चरित्र
            पारतंत्र आणि गुलामगिरीच्या अंध:कारात स्वराज्याची बीजे पेरून सुराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाने उभे करणाऱ्या शिल्पकार म्हणजे शिवमाता, राष्ट्रमाता, मातृशक्तीची प्रेरक प्रतिमा, सुराज्य घडवणारी शिवशक्ती, स्वराजजननी राजमाता जिजाऊ मासाहेब.
              इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ठामपणे उमटवला यात अग्रक्रमाने घ्यावे असे नाव म्हणजे राजमाता जिजाऊ.
'निश्चयाचा महामेरू| बहुत जनासी आधारू|'
 | श्रीमंतयोगी |
             असे ज्यांचे वर्णन केले जाते ती सारी पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता मासाहेब जिजाऊची.
           विदर्भातील सिंदखेड राजा येथे कर्तबगार लखुजी जाधव व गिरीजाबाई यांच्या पोटी  जन्माला आलेले तेजस्वी कन्यारत्न म्हणजे जिजाऊ. पराक्रमी घराणे, सत्ता, अधिकार आणि कर्तव्य यांचा सुरेख समन्वय साधणाऱ्या राजघराण्याचे संस्कार बाल जिजाऊंच्यावर घडले. सैनिकी शिक्षण, राज्यकारभारांची ओळख, युद्ध, न्यायनिवाडा, पराक्रमाच्या घटना यातून जिजाऊंचे बालपण घडले.  न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष व कर्तबगार राजे लखुजीरावांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा आणि आईच्या आदर्श मातृत्वाचा वारसा जिजाऊंना लाभला. यातूनच एक धाडसी, जिद्दी, स्वाभिमानी, आव्हान स्वीकारणारी वृत्ती विचारी, अभ्यासू, समंजस बाल जिजाऊ घडत गेल्या.
         शहाजीराजे यांच्याशी विवाह झाल्यानंतर भोसले- जाधव घराण्यातील संघर्ष, मोघल- सुलतान यांचा धुमाकूळ, स्वतःचे बंधू -दीर यांच्या हत्या, मराठ्यांच्या संसाराची, प्रदेशाची, तीर्थक्षेत्रांची दैना अशा प्रसंगात झगडणे व संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा भागच बनला.
           आसमानी व सुलतानी संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना आशेची एक ज्योत मनात घेऊन शिवनेरी गडावर त्यांनी तमाम मराठी स्वप्नांना शिवबाच्या रूपाने जन्म दिला.
शिवनेरीच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावराला शिकवताना, शिवरायांना महाभारत आणि रामायणातील श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टीचे बोधामृत पाजताना स्वराज्य निर्मितीचे बाळकडू पाजून "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे." या मूलमंत्राचा धडा गिरवला. बालपणापासूनचे धडे व अनुभवलेला संघर्ष याची फलश्रुती म्हणून जिजाऊंनी बाल शिवाजींना राजा म्हणून घडवले. व्यायाम, अध्ययन, प्रशासन, कला, साहित्य, स्वावलंबन, युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, नीतीशास्त्र यांचे धडे देणे सुरू केले.
              पुण्याच्या लाल महालात प्रवेश करून पुणे भूमी सोन्याच्या नांगराने नांगरून त्यांनी आपल्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा उठवल्या. रांझाच्या पाटलाचा प्रसंग असो वा इतर गुन्हे, न्यायनिवाडा हा निपक्षपातीपणे करावा हे धडे त्यांनी दिले. शहाजीराजांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबा व मावळ्यांमध्ये हिंदवी स्वराज्याची बीजे त्यांनी रोवली.
            जिजाऊंच्या प्रत्येक कृतीला वैचारिक आधार असे. जिजाऊ सश्रद्ध होत्या, भावनिक होत्या, पण अंधश्रद्धाळू नव्हत्या. शहाजीराजे गेल्यानंतर जिजाऊ स्वतः सती गेल्या नाहीत तर आईलाही सती जाऊ दिले नाही. जिजाऊंनी सर्व जाती-धर्माच्या प्रजेचे हित सदैव पाहिले. समस्त रयत ही आपली, हे वाक्य त्यांनी कायम जपले. त्यामुळे शिवरायांचे सर्व मावळे समाजातील कर्तबगारीचे प्रतिक होते.
            दूरदृष्टी हा जिजाऊंचा एक महत्त्वाचा गुण होता. कोंढाणा किल्ला, अफजलखानाचा वध यात त्याचा प्रत्यय येतो. आग्रा भेट, लाल महालाचा वेढा, पन्हाळ्याचा वेढा यासारख्या कठीण प्रसंगी जिजाऊंचा कणखरपणा, धाडस, संयम, राजकौशल्य अनुभवास मिळते.  स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवताना किल्ले कसे बांधावे इथपासून ते रयतेची मने कशी घडवावी इथपर्यंत, सहकारी तत्त्वावर शेती कशी करावी इथपासून ते जलव्यवस्थापन कसे करावे इथपर्यंतची एक दृष्टी त्यांच्याजवळ होती.
          जिजाऊ या शिल्पकार होत्या. रयतेच्या कल्याणाला त्यांनी सर्वतोपरी मानले. एक मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून व राजमाता म्हणून सर्वच बाबतीत जिजाऊ वेगळ्या होत्या. 
            जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्कारांचा खजिना. निरंतर टिकणारी मानवी मूल्यांची शिकवण. एक परिवर्तनवादी व्यक्तीत्व. जिजाऊंचे स्मरण व अनुकरण ही 21 व्या शतकातील गरज आहे. जिजाऊच्यासारखे कर्तुत्व, नेतृत्व आणि विवेकी मातृत्वाच्या प्रतीक्षेत समाज आजही आहे.

-------------------------------------------------------------------
संदिप कोळी


Tuesday, 27 December 2022

आयुष्य समृद्ध करणारा अनुभव....

🌈 आयुष्य समृद्ध करणारा अनुभव....
         मंगळवार 27 डिसेंबर, दुपारी 1 ची वेळ. खिशातला कंगवा कुठेतरी हरवल्याने वाऱ्याने विस्कटणाऱ्या केसांना जागा दाखवण्याची जबाबदारी बोटांवर घेतली होती, पण दोन-तीन दिवसात हाताची अक्षमता व केसांची धडपड वाढल्याने शेवटी आज कंगवा घेण्याची सवडी काढावीच लागली.
         खरेदी म्हटलं की दुकान शोधण्याऐवजी सहज खरेदी करावी म्हणून रस्त्याच्याकडेच्या सुपरमॉलकडे गाडी वळवली. त्या छोट्या मॉलमध्ये आपल्या गरजेच्या अनेक वस्तू खुणावत होत्या, पण माझी गरज कंगवा होती व त्याचीच मागणी केली.
        सत्तरीच्या आसपास वय असणाऱ्या एका आजोबांनी आपल्या मांडणीतून नजर हटवत "कोणता रंग देऊ?" असा प्रश्न केला.
      " तुम्हाला आवडणारा द्या" असे म्हटल्यावर, सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर मध्ये हास्य आणत एक रंग काढून माझ्या हातात दिला. मी किंमत विचारल्यावर 5 रुपये सांगितले. मी 20 रुपयाची नोट काढून पुढे धरली तर आजोबा म्हणाले, "सुट्टे 5 रुपये पाहिजे. मी पुन्हा पाकीट तपासले 2 रुपयाची 3 नाणी मी आजोबांना दिली. कंगवा खिशात घातला व गाडी वळवणार इतक्यात आजोबा म्हणाले "तुम्ही 6 रुपये दिले, हा घ्या 1 रुपया" मी पण तो नम्रपणे स्वीकारला.
          तो 1 रुपया हातात घेताना मनात आले, किती सहजतेने त्यांनी तो प्रामाणिकपणा जपला आहे. त्या 1 रुपयाची किंमत त्यांना नक्की ठाऊक आहे.
         जगण्यात इतका सहजपणे असला की जीवनावरचे अनावश्यक ओझे आपोआप विरून जाते.

🖋️© संदिप

Wednesday, 30 November 2022

आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत?? - जपानकडून शिकूया

🌈 आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत??
         माणूस हा उत्सवप्रिय प्राणी. आपल्याला अनेक गोष्टी साजरा करायला आवडतात. नुकतीच आपण दिवाळी साजरी केली, त्यातच t20 चा वर्ल्डकप साजरा केला. ती पार्टी संपते तोपर्यंतच फुटबॉलचा वर्ल्ड कप सुरू झाला. 
           फुटबॉल हा जगाचा लोकप्रिय व सर्वाधिक खेळला जाणारा खेळ. त्यामुळे क्रीडा प्रेमींच्या नजरांबरोबर इतरांचे डोळे त्याकडे लागलेले. या फुटबॉल वर्ल्डकप मध्ये अनेक रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी घडतायत. त्यातीलच एक गोष्ट 23 नोव्हेंबर 2022 ची. कतार मध्ये घडलेली.
           मॅच होती जपान आणि जर्मनीची, जपानने मॅच 2-1 ने जिंकली.  साहजिकच जपानी लोकांनी जल्लोष आणि धिंगाणा करायला हवा होता, पण झालं भलतच. मॅच संपली खेळाडू अजून मैदानावरच होते. जिंकलेले आनंदी प्रेक्षक व इतर नाराज प्रेक्षक हळूहळू आपली जागा सोडून मैदान रिकामे करू लागले होते. आपल्याबरोबर आणलेल्या  खाद्यपदार्थांच्या पिशव्या व पेयांच्या बाटल्या तिथेच टाकून काढता पाय घेत होते. त्यांचं पण बरोबर होतं, कारण स्वच्छता हे काय त्यांचं काम होतं??
           या सर्व गडबडीत जिंकलेले जपानी फॅन मात्र वेगळ्याच कामात व्यस्त होते. जिंकलेल्या जपानी फॅन्सनी या खाद्य पदार्थाच्या रिकाम्या पिशव्या व बॉटल्स गोळा करायला सुरुवात केली. अगदी कुणी न सांगता आणि कोणत्याही फोटोसाठी नव्हे.
          काही मिनिटात या जपानी लोकांनी पूर्ण स्टेडियम मागणी केली. ज्यावेळी या जपानी लोकांना त्यांच्या सत्कार्यासाठी याबद्दल विचारले त्यावेळी ते नम्रपणे उत्तरले. आम्ही पाठीमागे असा कचरा ठेवत नाही व ते कार्यमग्न राहिले.

          जपानी लोकांची ही कृती कोणत्याही प्रसिद्धीसाठी, कौतुकासाठी किंवा मोठेपणासाठी नव्हती. ती होती चांगुलपणाची, ती होती संस्काराची, ती होती शिस्तप्रियेतेची, ती होती स्वतःच्या नजरेत मोठी होण्याची, ती होती पुढच्या पिढीला समृद्ध वारसा देणारी.
         पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवून जाणार आहोत?? हा प्रश्न ज्या वेळेला आपल्याला पडेल त्यावेळी जपानी माणसांचे हे उदाहरण कायम लक्षात राहील. आपल्या कृतीतून जगाला कौतुक आणि हेवा वाटणारी संस्काराची शिदोरी ते न बोलता पटवून गेले.
धन्यवाद.!.!.!


🖋️संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com

Sunday, 23 October 2022

संयम = विराट कोहली

🌈 संयम = विराट कोहली
 "सब्र कर बंदे, मुसिबत के दिन भी गुजर जायेंगे।
आज जो तुझ पर हसते है, कल वो तुझे देखते रह जायेंगे।"
           What a knock,  जब भी पाकिस्तान भीड है, विराट कोहली अकेला ही लढा है, I am your Dad,  बाप बाप होता है, King is Always King,  अपना किंग अकेला लडा है, असे अनेक स्टेटस आज सर्वांच्या व्हाट्सअप स्टेटस आणि इंस्टा स्टोरी ला आहेत.
         पण, अगदी काहीच दिवसांपूर्वी हाच विराट कोहली संपला. तो कसा t20 साठी पात्र नाही. त्याची जागा कशी टीम मध्ये होऊ शकत नाही. तो कसा t20 साठी योग्य राहिला नाही. त्याच्यात क्रिकेट शिल्लक किती? अशा अनेक बातम्या,लेख व कमेंट गेली काही काळ विराटच्या बाबतीत सतत चर्चेत राहिल्या. अगदी काही माजी क्रिकेटपटूनी विराटला मिळणाऱ्या अतिरिक्त संधी बाबत बोट दाखवले होते.
         पण, या ठिकाणी हा पण महत्त्वाचा भाग आहे. कारण या सर्व टीका, बातम्या, अफवा याबाबत विराट स्थिर राहिला. त्याने या सर्वामुळे खचून न जाता आपला खेळ उंचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या होणाऱ्या चुका टाळल्या व आज त्याने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आपणच किंग 👑 आहोत हे सिद्ध केले.
          या सर्व Bad Patch मध्ये विराटने दाखवलेला सर्वात मोठा गुण म्हणजे संयम होय. विराटकडे प्रचंड क्षमता आहे याबाबत कोणाला शंका नाही. त्याचे खेळाचे ज्ञान व फटके मारण्याची कौशल्य याबाबत त्याचे प्रतिस्पर्धी सुद्धा फॅन आहेत. विराटला गरज होती ती संयमाची व 'आपना टाईम आयेगा' याची वाट पाहण्याची आणि विराटने ते लिलया करून दाखवले.
            विराटकडे अजून क्रिकेट किती शिल्लक आहे? या प्रश्नाला त्याने पैकीच्या पैकी मार्क पाडून 'अभी तो मंजिले - ए - सफर मे बहुत कुछ बाकी है, हे सिद्ध केले. गेल्या काही डावापासून तो हे दाखवून देत होता, पण आजच्या भारत- पाक मॅचने त्याने स्वतःची जागतिक क्रिकेट मधील दहशत पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
          कधी हार मानू नका. परवाचा दिवस कठीण होता. कालचा आणखीन वाईट होता. पण आजचा दिवस सोनेरी क्षणाने आपली वाट बघत होता, हे विराटच्या संयमाने शिकवले. आपल्याला ही जगण्यातला संयम किती महत्वाचा आहे हे विराट ने जागून दाखवले आहे.
You Are the Boss Man
Virat ❤️

🖋️ संदिप कोळी

Tuesday, 18 October 2022

🌈 स्व:अवलोकन : Self Observation

              30 सप्टेंबर महिना अखेरची गोष्ट... महिना अखेर म्हणजे नोकरदाराच्या कामातील तसा धामधुमीचा दिवस. महिनाभराच्या कामातील काही अहवाल, आकडेवारी सादरीकरणाचा हा दिवस. हा नियमित ठरलेला कार्यभाग असला, तरी थोडा जास्त वेळ द्यावा हा लागतोच. 
               याप्रमाणे त्या दिवशी नियोजित कार्यभाग संपवला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. अजून घड्याळाचा काटा बरीच वेळ शिल्लक दाखवत होता. वर्षाच्या अखेरच्या एका कामाचा भाग म्हणून आपल्याच कामाचे स्व:अवलोकन करावे म्हणून सहज मागची पाने पलटली. मुद्दाम याठिकाणी हा स्व: अवलोकन शब्द वापरला आहे. सिंहावलोकन, वगैरे शब्द मनात घुटमळत होते, पण विषय इतका गंभीर नव्हता, म्हणून ते पुन्हा झाकून ठेवले. 
              मागच्या पानावरील पडताळणी घेत असताना एका ठिकाणी, गफलत झाली हे सहज लक्षात आले. चूक खूप मोठी नव्हती व मागच्याच महिन्यातील होती, पण जर ती लक्षात आली नसती व दुरुस्त केली नसती तर वर्षा अखेरीच्या अहवालापर्यंत ती तशीच राहिली असती. दोन्ही कामे मीच केली होती व थोडीफार त्रुटी ही माझ्या नजर चुकीमुळे राहिले, पण ती लवकर पाहिली म्हणून ती लवकर दुरुस्ती झाली.
             त्या दिवशी घडलेला हा छोटासा प्रसंग मला काही गोष्टी सहज शिकवून गेला. जीवनाच्या प्रवासात आपल्या आयुष्यात अनेक वेळा खूप गोष्टींच्या बाबतीत ही बाब लागू होते. मैत्री, प्रेम, नातेसंबंध, काम अशा बाबतीत काही कालावधी सरला की सिंहावलोकन नाही पण स्व: अवलोकन आपण नक्की करायला हवे. कारण मैत्री, प्रेम, नातेसंबंधात अनेक वेळा आपल्या नकळतपणे काही गोष्टींची गफलत, गैरसमज किंवा अपेक्षा यांचा गोंधळ झालेला असतो व हीच छोटी गोष्ट पुढे त्या नात्याला अडचणीत व आपल्याला त्रासदायक ठरू शकते. आपल्या या जगण्याच्या धावपळीत आपण इतके पुढे जातो की ती गोष्ट दुरुस्त करण्यासाठी आपण पुन्हा माघारी येत नाही व यातच त्या नात्याचा श्वास गुदमरतो. म्हणून वेळोवेळी असे स्व: अवलोकन केले तर आपण या छोट्या गोष्टी समजून छोटासा गुंता वेळीच सोडवू शकतो.     
                 सो फ्रेंड्स.... जगण्याचा हा छोटासा फंडा त्या दिवशी मी नकळत शिकलो. चला तर मग स्व: अवलोकन करून आपली काही चुकलेली गणिते वेळीच दुरुस्त करून उरलेल्या जीवनाची बाकी समृद्ध करूया.🌸

🖋️संदिप.....
sandip.koli35@gmail.com 

Wednesday, 1 June 2022

And the nest is empty again : आणि घरटं पुन्हा रिकामं झालं.....

आणि घरटं पुन्हा रिकामं झालं.....

                      १९ फेब्रुवारी २०२२ पहिल्यांदा गवताची काडी घेऊन ती आली. तसे तर घराच्या अंगणात आम्ही तयार केलेले लाकडी घरे आहेत, पण ती मोठी स्वाभिमानी, स्वतःचा संसार स्वतः उभा करायचा हा तिचा निश्चय मोठा...

                   दररोज काड्या, गवत, कापूस अशा तिच्या गरजेचे व घरट्यासाठी  लागणाऱ्या वस्तूने त्या दोघांची धडपड सुरू झाली. दररोज दिवसभर ती दोघे साहित्य आणून आपले नवीन घरटे गुंफत होते. बघता- बघता ६-७ दिवसात काडी - काडी जोडून त्यांनी छोटीसे इमले बांधले. एकटी चिमणी बसू शकेल एवढ्या आकाराचे ते छोटेसे घरटे आतून मात्र अगदी कापसासारखे होते.

                   चिमणी आता आमच्या घरची झाली होती. दिवसभर बाहेर फिरायची व संध्याकाळ झाली की एकटीच घरट्यात येऊन बसत होती. या दरम्यान तिने घरट्यात दोन अंडी घातली. हाच दिनक्रम काही दिवस चालू होता. घरट्यात बसल्यावर चिमणीचे फक्त तोंडच बाहेर दिसत असे.

                 अचानक एक दिवस पिल्लांचा चिव-चिवाट ऐकू येऊ लागला. दोन छोटी-छोटी पिल्लं घरट्यातून हळूच डोकावू लागली. छोटे शरीर, गुलाबी रंग, छोटी चोच, ती उघडल्यावर लाल रंगाचे दिसणारे अंतरंग...... पिल्लांचे आई व बाबा दोघे आळीपाळीने येऊन पिलांना भरवून जात होते.

                 दिवसभर फक्त पिल्लांचा चिव-चिवाट सुरू असे. आई-बाबा आल्यावर तर अगदीच गोंधळ.... ओरड.... संध्याकाळी त्या दोन पिल्लांसह चिऊताई त्या इवल्याशा घरट्यात अगदी निवांत बसायची. सकाळ झाली की रोजचा दिनक्रम सुरू.....

                दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. पिल्ले मोठी होऊ लागली आणि 20 एप्रिल च्या दरम्यान अचानक सगळं बंद झालं. एक-दोन दिवस बघितलं पण शांतता.......

               ती चिमणी आपल्या दोन लेकरांच्या पंखांना बळ देऊन घरटं रिकामं सोडून निघून गेली. अवघ्या दोन महिन्यात घरटं रिकामं झालं...

               निसर्गाचा काय करिष्मा आहे ना? त्या इवल्याशा चिमणीने इवलसं घरटं बांधून त्या इवल्याशा घरात दोन इवल्याशा पिलांना जन्म देऊन, वाढवून त्यांच्या इवल्याशा पंखात आकाश कवेत घेण्याचे स्वप्न दाखवून त्या इवल्याशा पिल्लांना घेऊन  घरटं पुन्हा रिकामं करून ती कायमची निघून गेली.

 -------------------------------------------------------------------------------------------------------------

 संदिप...

Sandip.koli35@gmail.com

 

Tuesday, 11 January 2022

राष्ट्रीय युवक दिन : National Youth Day

आज राष्ट्रीय युवक दिन...

स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस....

                 "दिवसभरात तुमच्या पुढे एकहि समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकहि प्रश्न पडला नाही तर तुमच्या आयुष्याच्या प्रवास चुकीच्या रस्त्यावरुन सुरु आहे अस समजायला हरकत नाही"....

                  हे स्वामी विवेकानंद यांचे वाक्य पण आजच्या आमच्या पिढीला हे आवडत नाही कारण आम्हाला समस्या नको असतात सगळ्या गोष्टि झाल्या पाहिजेत आणि त्याही सहज आणि कोणत्याही त्रासाशिवाय मग ती कोणतीही गोष्ट असो…..

       आमच्या तरुण्याला आणखी एक शाप आहे तो म्हणजे वाट न बघण्याचा. आम्हाला सगळ्या गोष्टी इंस्टेंट लागतात. "सब्र का फल मीठा होता है।" पण हे 'सब्र' नावाच फळ पण आम्हाला लगेच हव असते. आणि या साठी आम्ही काहीही करू शकतो( काहीही चा अर्थ कहिहिच ) मग तो मार्ग so called सन्मार्ग असो वा नसों.

          आजचा युवक  हा देशाचा भावी आधारस्तंभ असतो. आणि भारतात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. या शक्तीचे केंद्रीकरण होणे गरजेचे आहे. केंद्रीकरण झाले तर आणि तरच त्या शक्तीचे विधायक कार्यात रूपांतर होऊ शकते. नाही तर सध्या आपण बघतो की हीच  शक्ती कुठल्या मार्गाने आणि कशी वापरली जाते.

       असो आजचे आम्ही तरुण हुशार आहोत, शिक्षित आहोत, (संस्कारित आहोत) त्यामुळे आम्हाला या गोष्टी कळतात पण 'वळत नाहीत'. आम्हाला फ़क्त त्या वळवुन घ्यायाचा प्रयत्न करायचा आहे.

                             स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन व सुधारण्याचे अभिवचन.....

-------------------------------------------------------

© संदिप

Sandip.koli35@gmail.com




Tuesday, 14 September 2021

तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची....

 

तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची....

 

                  इचलकरंजी शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरत असताना दोन दृष्टिहीन दिव्यांग मुलगा- मुलगी आपल्या चटकन नजरेत आली असतील. अगरबत्ती व कापूर विकणारी ही जोडी म्हणजे करीम आणि अनिशा.  चंदूरला राहत असणारी ही जोडी दररोज सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 - 6 वाजेपर्यंत  इचलकरंजी शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरून अगरबत्ती व कापूर विकून सन्मानाने जगत आहे. अगरबत्ती 15 रुपये व कापूर 10 रुपये या फिक्स दराने या दोनच वस्तू ते दिवसभर विकतात. स्टँड पासून डेक्कन पर्यंत, तर कधी शाहू पुतळा-ASC कॉलेज पर्यंत, तर कधी जनता चौक, महात्मा गांधी पुतळयापर्यंत, एकमेकांना आधार देत- एकमेकांचा आधार होत या रहदारीच्या रस्त्यावर त्यांचा उद्योग मोठ्या आनंदात व उत्साहात सुरू असतो.

              करीम पदवीच्या पहिल्या वर्षात तर अनिशा बारावी कॉमर्स झाली आहे. बोलताना विनम्र व सभ्य बोलणारी ही जोडी जगण्याचा नवा उत्साह देते.

            दोन मिनिटे अंधार झाला तरी आपल्याला चाचपडायला होते पण आयुष्याच अंधारमय असताना करीम व अनिशा त्यावर मात करून जगण्याचा नवा मंत्र देतात. सर्व काही असताना एखादी गोष्ट करताना अडचणींचा भला मोठा पाढा आपल्याला तोंडपाठ असतो. नकाराची इतकी कारणे आपण तयार केलेली असतात की त्या नकाराचे ओझे आपल्या मानगुटीवर बसलेले असते.

               आपल्या सभोवती करीम-अनिशा सारखे उर्जास्त्रोताचे  अखंड झरे पाहिले की आपल्या नकाराचे मुखवटे आपोआप गळून पडायला हवेत. अडचणी पाहून नकाराची घंटा वाजवत पळून जाण्यापेक्षा याच अडचणीच्या छाताडावर नाचून त्यावर मात करायला अशी ऊर्जा स्त्रोत प्रेरणा देतात.

" ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं।

इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है।"

         त्या दोघांकडे बघितले की आपल्या काही अडचणी व समस्या शुल्लक वाटू लागतात. आयुष्य आव्हानांनी भरलेले असावे आणि अशी सर्व आव्हाने आपल्याला पेलता यावेत ही सकारात्मक ऊर्जा ही मुलं देतात.

"जो वळखीतसे औक्ष म्हणजी मोठी लडाई

अन हत्याराच फुलावानी घाव बी खाई

गल्यामंदी पडल तिच्या माळ इजयाची

तु चाल पुढ तुला र गड्या भीती कशाची, पर्वा बी कोणाची"

 

(टीप- सदर पोस्ट ही आपण त्या दोघांना  मदत करावी म्हणून नाही तर आपल्याला ऊर्जा मिळावी म्हणून लिहिली आहे. बाकी दोघे आत्मनिर्भर, प्रचंड उत्साही व आपल्या कष्टात व कामात आनंदी आहेत)

 ---------------------------------------------------------------------------------------------------

 संदिप कोळी

Sandip.koli35@gmail.com

(सदर छायाचित्र दोघांची परवानगी घेऊन घेतले आहे.)


Tuesday, 11 May 2021

Such innocence must last : इतकी निरागसता टिकायला हवी

 

इतकी निरागसता टिकायला हवी....

                   लॉकडाऊन म्हणजे सक्तीची सुट्टी.  वेळ जात नव्हता म्हणून शेतात फेरफटका मारायचा बेत ठरला. फिरत असताना सायंकाळी 6 च्या सुमारास शेताच्या एका कोपऱ्यात पक्षांचा गलका सुरू होता. थोडं बारकाईने बघितल्यावर लक्षात आले की ससाणा खाली बसला होता. सुरुवातीला वाटले त्याला इजा झालीय म्हणून तो बसला आहे पण पक्ष्याच्या गोंधळामुळे तो उडून जाऊ लागला पण पायात काहीतरी होते त्यामुळे त्याला उडता येईना. शेवटी पक्ष्याच्या गोंधळा मुळे तो ससाणा उडून गेला.

                  उत्सुकतेपोटी  अर्णव आणि मी त्या जागेवर पोहचलो. आमचा अंदाज खरा ठरला. त्या ससाण्याने छोटा ससा पकडला होता पण तो त्याला घेऊन जाता आला नाही. तो ससा तिथेच पडला होता. ते पाहून अर्णवच्या डोळ्यात पाणी आले. "बाबा तो जिवंत आहे त्याला वाचवूया, त्याला पाणी देऊया, त्याला घरी नेऊया, मी त्याला गवत देतो" अशी त्याची केविलवाणी धडपड सुरू होती. मी त्याला समजावले त्या पक्ष्याने चोचीने त्याला इजा केली आहे, ते पिल्लू छोटे आहे, घरी घेऊनही ते जगणार नाही. आपण त्याला फार काही मदत करू शकणार नाही.

                 अर्णव मात्र ऐकायला तयार नव्हता, शेवटी त्याचा केविलवाणा चेहरा, त्याची संवेदनशीलता व त्याची निरागसता पाहून त्याला पाणी पाजून, हळद लावूया व पुन्हा त्याला त्या ठिकाणी सोडुया यावर या माझ्या सल्ल्यावर  तो जड मनाने तयार झाला.

                आम्ही त्याला थोडे पाणी पाजले, काही ठिकाणी रक्त येत होते तिथे हळद लावली. मात्र त्या सस्याला खूप इजा झाली होती त्याची मान सरळ होत नव्हती. काही वेळ त्याने धडपड केली पण थोड्या वेळातच त्याचा जीव गेला.

                 अर्णवच्या डोळ्यात त्याला वाचवता आले नाही याचे दुःख व त्या ससाण्याविषयी प्रचंड राग होता. पण हाच निसर्ग आहे व त्याचे नियम सर्वांना लागू असतात हे त्याला पटत नव्हते. अंधार झाला तरी तो घरी यायला तयार नव्हता.

                एखाद्याला इतक्या सहज मदत करावी ही त्यांच्यातील भावना पाहून बाप म्हणून अभिमान वाटला. आयुष्यात प्रत्येक प्रसंगी इतकं निरागस राहून इतरांना मदत करायला यायला हवे. अर्णव ची इतकी निरागसता वाढत्या वयाबरोबर  टिकून रहावी हीच इच्छा....

 

( टीप : छायाचित्र यासाठी की अर्णवच्या डोळ्यात दिसणारी मदतीची तळमळ सुखावणारी  होती )

संदीप कोळी

sandip.koli35@gmail.com




Tuesday, 27 April 2021

Everything has to be done by me : सगळं ‘मी’ च करायला हवे

 

सगळं ‘मी’ च करायला हवे

                    एक दिवस उजाडतो. आपल्या समोर कामाचा डोंगर अचानक उभा राहतो. हे काम करू, का ते काम करू का ते करू, सगळा गोंधळ उडतो. क्रम ठरवायला गेलो  तर सर्वच कामे महत्वाची वाटू लागतात. मग कोणते काम प्राधान्याने करायचे व कोणते नंतर करायचे हेच लवकर ठरत नाही.

                   मनाचा गोंधळ उडतो. धावपळ व्हायला लागते. हे करू कि ते करू यात कोणतेच काम धड्से होत नाही.  प्रथम कोणते काम करायचे हे ठरवायला व आपले काम तर ठरतच नाही व  आपले काम न ठरता आपला बराच वेळ फक्त ठरवण्यात जातोय हेच समजायला बराच वेळ जातो.

                  तसे बघायला गेले तर हा सर्व पसारा व कामाचा डोंगर आपणच उभा केलेला असतो. फक्त त्या-त्या वेळी आपल्या कामाचा योग्य पाठपुरावा करून काम पूर्ण न केल्यामुळे ती कामे आपल्या पुढे ब्रह्म म्हणून अचानक उभी राहतात आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो.

                  मुळातच प्रत्येक गोष्ट आपल्या साठीच आहे , प्रत्येक वेळी ती आपणच करायला हवी व आपल्यालाच मिळायला पाहिजे. कदाचित या सर्वाचा एकत्रित परिणामातून अनेक प्रश्न निर्माण होत असतील. बहुतेक वेळा आपल्या अतिमहत्वकांक्षेचा हा त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो व आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.

                 आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी. निसर्गाचा एक अंतिम नियम आहे. आपण नव्हतो त्यावेळीही जगाच्या सर्व क्रिया सुरळीत सुरु होत्या, सध्या  आपण काहीही केले नाही तरीहि हे सर्व सुरळीत असणार आहे व उद्या आपण नसल्यावरही हे सुरूच राहणार आहे.

           फक्त आपला एक मोठा गैरसमज आहे कि “सगळं मी च करायला हवे.”

कदाचित हाच आपल्या समोरील प्रश्न व हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकेल!!!

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...