Tuesday, 16 February 2021

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

                  बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे. हे मानणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताच्या पावन भूमीत सदैव चमकत राहणारा हिरा आहेत. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक हुशार, विचारवंत, समाजसेवक, देशभक्त लोक झाले व आहेत. ज्यांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. अशा सर्व थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात आदरणीय व अग्रभागी आहे.

                  आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश राज्यातील महू या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर होय. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. ते एका गरीब दलित कुटुंबात जन्मले होते ज्या मुळे त्याना त्यावेळी अस्पृश्यतेचा सामना करावा लागला.

                  डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे एकच अस्पृश्य होते ज्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये १८९७ मध्ये नोंदणी केली. त्यांनी १९०७ मध्ये मॅट्रीकलेशन पास केले व बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १९१२ मध्ये अर्थशास्त्र आणि राजकीय विज्ञान आणि १९१५ मधे एम.ए ची पदवी प्राप्त केली. १९२७ साली त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पी.एच.डी प्राप्त केली. डॉ. आंबेडकर त्या काळात देशामध्ये अशी एकच व्यक्ती होती ज्यांचाकडे उच्च डिग्री होती. त्यांनी एक शिक्षक, प्राध्यापक, वकील व अकाउंटंटचे ही काम केले 

                      डॉ. आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते, तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी लोकांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि मागासलेपण दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले ज्ञान, माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविली.

                  शिक्षणामुळे बाबासाहेबांच्या वैचारिक व सामाजिक दृष्टिकोनामध्ये खूप मोठा बदल झाला. दलित म्हणून आपल्या वाट्याला आलेले दुख आपल्या समाजाच्या वाट्याला येऊ नये म्हणून डॉ.बाबासाहेब आयुष्यभर झटले. बाबासाहेबांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. महाड येथील चवदार तळे येथे आंदोलन करून ते दलितांच्यासाठी खुले केले. अश्पृश्तेचे समर्थन करणाऱ्या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे आंबेकरांनी दहन केले. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्यागृह करून दलितांच्यासाठी खुले केले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली.  केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.

                 वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत ही ५ वृत्तपत्रे सुरु केली. लोकांच्या वैचारिक जागृतीसाठी त्यांनी शुद्र कोण होते?, थोट्स ऑन पाकिस्तान, रिडल्स इन हिन्दुइसम, कास्टस इन इंडिया, बुद्ध & हिज धम्म , द अनटचेबल्स यासारख्या विविध पुस्तकांचे लेखन केले आहे.

           भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान निर्मितीचे शिवधनुष्य डॉ. बाबासाहेबांनी लिलया पेलले व जगातील एक उत्कृष्ट लोकशाही संविधांनाची निर्मिती केली.                      

                     डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.

               अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय.
अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.

 

   -संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...