Tuesday, 16 February 2021

Makar Sankranti : मकर संक्रांती

 

मकर संक्रांती

                      भारत हा उत्सवप्रिय देश आहे. आपल्या देशात अनेक उत्सव आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात. भारतासारख्या खंडप्राय देशात हे उत्सव वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात मात्र त्यामागील भावना सारखीच असते. आपल्या देशात साजरे होणारे सर्व सण व उत्सव हे वेगवेगळ्या भौगोलिक व नैसर्गिक कारणावर आधारित आहेत. भारतातील साजरे केल्या जाणाऱ्या उत्सवांपैकी मकर संक्रांती हा एक महत्वाचा सण आहे. मकर संक्रांती हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. जो सूर्याच्या बदलावर  साजरा केला जातो.

                 मकर संक्रात हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला संक्रांत हा सण येतो. मकर संक्रांत या सणामागे एक धार्मिक आख्यायिका आहे. फार वर्षांपूर्वी लोकांना त्रास देणारा संकासूर नावाचा राक्षस होता. त्याला मारणे कठीण होते. त्यामुळे देवीने संक्रांतिचे रूप धारण करून संकासूराला ठार मारले आणि सगळ्या जनतेला सुखी केले. म्हणून हा दिवस मकर संक्रांति या नावाने साजरा केला जातो असे मानले जाते.

             जेव्हा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात ज्या दिवशी प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते. या दिवसापासून सूर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकताना दिसते हे मकर संक्रांत या सणामागील भौगोलिक कारण आहे.  

                     भारत देशाच्या विविध प्रांतात मकर संक्रांती हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये या सणाला संक्रांती या नावाने संबोधले जाते. पंजाब आणि हरियाणामध्ये हा सण नवीन पिकाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. तर आसाम मध्ये हा सण बिहुच्या रुपात साजरा केला जातो.

                 भारत देशाची संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे. मकर संक्रांती दिवशी स्त्रिया आपल्या शेतामध्ये व मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना देतात. या दिवशी स्त्रिया हरभरे, उस, बोरे, गव्हाची लोंबी आणि तीळ इ. वस्तू देवाला अर्पण करतात. याशिवाय तीळ आणि गुळ लाडू हे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात मकर संक्रांती हा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात. संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकू करतात आणि वाण वाटतात. सर्वजण एकमेकांना तिळगुळ वाटून  तिळगुळ घ्या आणि गोड बोलाअसे सांगून शुभकामना देतात व मोठ्यांचे आशीर्वाद घेतात.                

              मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशाच्या अनेक भागामध्ये यात्रा आयोजित केल्या जातात. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे कुंभमेळा. हा कुंभमेळा हर १२ वर्षांनी नाशिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जैन इ. जागी चक्राकार पद्धतीने आयोजित केला जातो. यादिवशी यात्रेकरू आपल्यातील पवित्र नद्यामध्ये स्नान करतात. संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने सूर्यदेव आनंदी होतात असे मानले जाते.

                      मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. देशात अनेक ठिकाणी असे पतंग उडवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. यादिवशी आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडवले जातात. लहानांच्या बरोबर मोठ्या व्यक्तीही यामध्ये उत्साहाने सहभाग घेतात.

                     भारत देशामध्ये मकरसंक्रांत या सणाला खूप महत्त्व आहे. उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना सूर्याच्या उत्तरायणामध्ये झालेल्या संक्रमणामुळे त्यांना अधिक प्रकाश आणि उष्णतेचा लाभ मिळतो. मकर संक्रांती हा भारतातील एक शेतीशी संबंधित असणारा सण आहे. तसेच मकर संक्रांतीला लहान थोरांना तिळगुळ वाटून नात्यांमधील गोडवा वाढतो. तसेच मकर संक्रांती हा सण लहान मोठ्यांना मिळून मिसळून राहण्याचा संदेश देतो.

 

   -संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

            

 

 

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...